कानडी वाङ्मय
कानडी वाङ्मय
विभाग दहावा : क ते काव्य
कानडी वाङ्मय - कानडी हीं तामिळ, तेलगू, आणि मल्याळम् भाषांशीं नातें असलेली आणि त्यामुळें द्राविड भाषाकुलांत मोडणारी भाषा होय. ही भाषा साहित्ययुक्त आहे. गोव्यापासून गंगातीरावरील राजमहालापर्यंत एक रेषा काढल्यास तिच्या दक्षिणेकडील भाग द्राविड भाषांनी व उत्तरेकडील भाग आर्यन भाषांनी व्यापला आहे, असें दिसून येईल. बलुचिस्तानांतील ब्राहुइ ही एक किरकोळ भाषा वगळल्यास, जगांत द्राविडी भाषांशीं निकट संबध असणार्या दुसर्या भाषा मुळींच आढळून येत नाहींत. गोव्याची भाषा ही देखील कानडीशीं संबद्ध आहे.
का न डी दे श - कानडी बोलणार्या लोकांची संख्या एक कोटीहून अधिक आहे. ही भाषा बोलणार्यांचा प्रदेश म्हणजे सबंध म्हैसूर संस्थान, निजामी राज्याचा पश्चिमार्ध, मुंबई इलाख्यांतील दक्षिण जिल्हे ( ज्याला हल्लीं '' दक्षिण महाराष्ट्र '' म्हणतात तो प्रदेश ) आणि मद्रास इलाख्यांतील उत्तर कानडा व बल्लारी हे जिल्हे इतका मिळून आहे पश्चिम घाट व त्याच्या पायथ्याची जमीन सोडून दिल्यास हा प्रदेश समुद्रसपाटीपासून १,२०० ते ३,००० फूट उंच आहे.
कवि-राजमार्गात ( इ. स ८५० ) कानडी देश कावेरी पासून गोदावरी नदीपर्यंत पसरला होता असा उल्लेख आहे. खोदीव लेख, बखरी, स्थानिक नांवे इत्यादी पुराव्यांवरुन कोल्हापूरसुद्धां एके काळी काऩडी हद्दींत होतें असे दिसतें. याचप्रमाणें सोलापूर शहर व जिल्हा यांतून पुष्कळ कानडी खोदीव लेख आढळून येतात. यावरुन कानडी देशाची उत्तरसरहद्द मराठ्यांच्या स्वार्यांमुळें आंत जाऊं लागली, हें उघड होतें.
मद्रासच्या दक्षिणेस असणार्या किनार्याकडील भागास, ते मुख्य कानडी देशाच्या अगदी बाहेर असून त्या जिल्ह्यांतून तामिळी भाषा प्रचारांत असतांहि, ''कर्नाटक'' असें जें संबोधण्यांत येतें याला कारण इंग्रजांनी जेव्हां पूर्वकिनार्यावर वस्ती केली, तेव्हां कृष्णानदीपासून कन्याकुमारीपर्यंत सबंध दक्षिण हिंदुस्थान विजयानगरच्या गादीवर असलेल्या कानडी घराण्याच्या अंमलखाली असून, त्याला कर्नाटकराज्य या नांवानें ओळखीत असत, हें होय.
कानडी भाषा - कानडी लिपीक १६ स्वर आहेत. मात्र ऐ (र्हस्व ए) व ओ (र्हस्व ओ) हे अधिक असून लृ मुळींच नाही. मराठीतील सर्व व्यंजनेंहि आहेत. च व ज यांचे उच्चार मात्र शुद्ध - तालव्य व दंत - तालव्य असे दोन्ही आहेत. बाराखड्या मराठीतल्या प्रमाणेंच म्हणतात. अर्धी, जोड व ॠकार हीं अक्षरेंहि आहेत. जोडाक्षरांतील उच्चाराच्या क्रमानें एका अक्षराखालीं दुसरें अक्षर जोडून लिहितात; पण त्या अक्षराचा शिरोभाग लिहीत नाहीत. जोडाक्षरास बाराखडीच्या खुणा जोडावयाच्या असल्यास त्या प्रथम अक्षराला जोडून मग खाली दुसर्या अक्षराचें चिन्ह लिहितात. सूर्य, अर्क वगैरेंतील रेफ दाखविण्याला एक विशिष्ट चिन्ह (६) अक्षरापुढें लिहितात.
तीन लिंगें, तीन वचनें व आठ विभक्ती कानडींतहि आहेत. अनेकवचनी गळु शब्द योजितात. विभक्ति प्रत्यय खालीलप्रमाणे :-
| प्रथ. | उ. | पंच. | इंद |
| द्वि. | अ.अंनु. | षष्ठि. | अ |
| तृ. | इंद. | सप्त. | अल्लि. |
| चतु. | गे.इगे.क्के | संबो. | अं.ए. |
सर्व नामांचे प्रथम - द्वितीय-तृतीय असे तीन पुरूष आहेत. वर्णदर्शक, संख्यादर्शक व गुणदर्शक असे विशेषणांचे तीन प्रकार आहेत.
तत्पुरूष, कर्मधारय, बहुव्रीहि, द्वंद्व व द्विगु, हे संस्कृतांतल्याप्रमाणें समास आहेत.
क्रियापदांत सकर्मक व अकर्मक असे दोन भेद असून काल, अर्थ, पुरूष, लिंगे व वचनें त्यांनां असतात.
स्थल, काल, रीति, अनुकरण, विभक्ति, निपात, समुच्चय उन्दार व संबोध यांची वाचक अशी अव्ययें आहेत. वाक्यरचना मराठींतल्याप्रमाणेंच असते.
भाषेचे अतिप्राचीन नमुने - इजिप्तमध्यें सांपडलेल्या एका ख्रिस्ती शकाच्या दुसर्या शतकांतील ग्रीक हस्तलिखितांत हिंदुस्थानामधल्या कोणत्यातरी एका भाषेंत लिहिलेले थोडे शब्द आढळतात; ते कानडी असावेत असें डॉ. हुल्टझशचें म्हणणें आहे. यानंतर कानडी भाषेंत लिहिलेले प्राचीन खोंदीव लेख साहाव्या शतकापासून पुढें आढळतात.
कानडी धुळाक्षरें व लेखनलिपि - कानडी भाषा लेखनांत आणून जागतिक वाङ्मयांत तिचा प्रवेश करवून देण्याचें श्रेय सर्वस्वी उत्तरेकडील संस्कृत पंडितांनां आहे. या भाषेच्या व्याकरणसंज्ञा व धाटणी संस्कृताच्या धर्तीवर आहे.
वर्णमाला अक्षरविषयक असून, संस्कृत वर्णमालेच्या क्रमानुसार आहे. यांत देखील दहा महाप्राण व्यंजनें, दोन उष्मवर्ण आणि कांही स्वर व अंतस्थवर्ण आहेत. वास्तविक पहातां द्राविडी शब्दांनां याची जरूरी नसते. आतां याच्या उलट संस्कृतामध्यें न येणारे असे पांच वर्ण या मालेंत आहेत. लहान मुलांकडून त्यांच्या शिक्षणारंभापासून अमरकोश पाठ म्हणून घेण्याची सार्वत्रिक पद्धत असल्यानें या भाषेंतील उच्चार संस्कृत उच्चारांसारखे बनण्यास बरीच मदत झाली आहे.
तेलगु व कानडी लेखनलिपि एक असून, ती पश्चिमहिंदुस्थानांतल्या लेण्यांवरील दक्षिण अशोकी लीपीपासून निघालेली आहे. ही लीपि दक्षिण हिंदुस्थानभर पसरून जावामध्येंसुद्धां गेलेली आहे.
ज्या भाषावस्थेला ''प्राचीन कानडी'' अशी संज्ञा आहे ती नष्टप्राय व अव्यावहारिक आहे अशांतला भाग नाही. आधुनिक कानडी कवितेंत तींतील शब्द व विभक्त्या यांचा उपयोग करतात.
शेजारच्या भाषांचा परिणाम - बहुतेक सर्व अमूर्त, धार्मिक, शास्त्रीय, व तत्वज्ञानविषयक संज्ञा संस्कृत आहेत. अतिशय जुन्या ग्रंथांत सुद्धां संस्कृत शब्द भरपूर आहेत. संस्कृत ही कानडीची आई नसली तरी दाई खास आहे, असें जें म्हणण्यांत येतें त्यांत पुष्कळ तथ्य आहे. कारण संस्कृतनें तिच्या ठिकाणी तेज घातल्यानें तर ती वाङ्मयभाषा होण्याला योग्य झाली.
तेलगूचा व हिचा अति निकट संबंध असल्यानें विभक्तयांच्या बाबतींत तेलगूचा हिच्यावर परिणाम झालेला दिसतो. या प्रदेशाच्या वायव्य भागांतील पोटभाषांवर मराठी भाषेनें परिणाम केला आहे.
कानडी वाङ्मयाच्या इतिहासांतील युगें :- एकामागून एक बळावत जाणार्या धार्मिक संप्रदायानुसार कानडी वाङ्मयेतिहासांत कांही युगें कल्पितां येतील, ती अशी :-
(१) बाराव्या शतकाच्या मध्यापर्यंत निव्वळ जैन वाङ्मय होते; आणि तें यानंतर पुढेंहि कित्येक दिवस वरचढ राहिलें होतें. यांत सर्व प्राचीन आणि पुष्कळशीं अतिशय उच्च दर्जाचीं कानडी लिखाणें येतात. कर्नाटकी जैन वाङ्मय, हें एकंदर जैन वाङ्मयाचा अत्यंत महत्वाचा भाग होय. जैनांच्या इतिहासाच्या दृष्टीनें या संप्रदायाचें वैशिष्ट्य स्थापन करण्यांत जैन आचार्यांनी जितकी खटपट केली तितकी कोणत्याहि भागांतील आचार्यानीं केली नाही.
(२) इ.स. ११६० म्हणजे जेव्हां बसवाचार्यानें जुन्या वीरशैव किंवा लिंगायत धर्माचा पुनरूद्धार केला, त्या सालापासून लिंगायत वाङ्मयास सुरूवात झाली. या नव्या धर्मचालनेमुळें जी महत्वाची गोष्ट घडून आली ती ही की, जैनांच्यापेक्षां फार निराळी अशी एक मोठी वीर-शैव वाङ्मयविषयक चळवळीची लाट पसरली.
(३) बाराव्या शतकाच्या प्रारंभी रामानुजाचार्याकडून समुत्थित झालेला व मघ्वाचार्य (सुमारें इ.स. १२३०) आणि चैतन्य (१५००) यांनी वाढवलेला वैष्णवधर्म कानडी वाङ्मयाच्या तिसर्या युगारंभास कारणीभूत झाला. या युगांत ब्राह्मणी विचार श्रेष्ठ स्थान पावले व त्यांनी आपला दर्जा अद्याप कायम ठेवला आहे. कानडी वाङ्मयावरील यांच्या दृश्य परिणामाला इ.स. १५०८ पासून म्हणजे ज्या वेळी भारताची कानडी आवृत्ति निघाली त्यावेळेपासून सुरूवात झाली असें म्हणावयास हरकत दिसत नाही. पाखंडांनी देशी भाषांचा प्रथम आश्रय करावा आणि ब्राह्मणांनी नंतर स्वकीय देशी वाङ्मय तयार करून भाषा व लोक यांस ताब्यांत घ्यावें हा नियम कर्नाटकांतहि दिसतो.
४ सध्यां अर्वाचीन युगाला सुरूवात आहे. याचा जन्म कानडी वाङ्मयावर पाश्चात्य विचारांचा आघात व इंग्रजी वाङ्मयाचा परिणाम होऊन झालेला आहे.
हे कानडी वाङ्मयाचे भाग धार्मिक गोष्टीतच केवळ भिन्न आहेत असें नाही, तर वाङ्मयस्वरूपांतहि भिन्न आहेत. जैन ग्रंथ बहुधां चंपुरूपांत म्हणजे गद्यपद्यांत आहेत, पद्यांत निरनिराळे अनेक छंद असून त्यांत वाङ्मयकौशल्य चांगले दृग्गोचर होतें. लिंगायत वाङ्मय बहुतेक गद्यरूपांत आहे. पद्यभाग कांही त्रिपदींत तर कांही षटपदींत आहे. मोठमोठे ब्राह्मणी ग्रंथ देखील षटपदींत म्हणजे सहा ओळींच्या पद्यांत आहेत. पण याखेरीज त्या ग्रंथांतून लोकमान्य झालेली रसात्मक काव्येंहि अनेक आहेत. अर्वाचीन युगांतील वाङ्मय बहुतेक गद्यमय आहे; तरी 'यक्षगान' यासारखें लेखन लोकप्रिय झालें आहे.
राजकीय इतिहास वाङ्मयेतिहास - वाङ्मयाचें सातत्य समजावून घेण्यासाठी आणि राजकीय परिस्थितीशी वाङ्मयाची तुलना करण्यासाठी कानडी देशांतील राज्ये व घराणी यांची मोजदाद घेतली पाहिजे. खालील घराणी या देशांत एकामागून एक होऊन गेलीं आहेत. त्यांचा प्रथम नामनिर्देश करणें बरें-कदंब, पल्लव, गंग, चालुक्य, राष्ट्रकूट, कलचुरि, चोल, होयसल, बल्लाळ, यादव, आदिलशाहि, विजयानगर व वोडेयर वगैरे तिसर्या शतकापासून आतांपर्यंत होऊन गेलेल्या घराण्यांची ही यादी आहे. कानडी वाङ्मयास आश्रय देणार्या राजांच्या राजधानीची शहरें कालानुक्रमानें पुढें दिली आहेत.
इ.स. ४०० - ५५० बनवासी (कदंब; ), वातपी (पहिले पल्लव), तताकाद (गंग).
इ.स. ५२०-८२० वातापी (चालुक्य आणि राष्ट्रकूट); तलकाद.
इ.स. ८२०-१०४० तलकाद, मान्यखेत (राष्ट्रकूट).
इ.स. १०४०-१३१२ कल्याण (पश्चिमचालुक्य), द्वारसमुद्र (बल्लाल).
इ.स. १३१२-१५६५ विजयानगर.
इ.स. १५६५ - म्हैसूर.
प्रत्येक राजघराण्याच्या आश्रयाखाली कांही वाङ्मय तयार झालेंच आहे. सध्यां वाङ्मय कांही अंशी राजाश्रयानें आणि कांही लोकाश्रयानें वाढत आहे. सध्यांची कानडी वाङ्मयाची केंद्रस्थानें म्हैसूर, बेंगळूर, धारवाड, मंगलोर व बल्लारी ही होत. यांपैकी म्हैसूर व बेंगळूर ही मुख्यतः राजाश्रयाची स्थानें होत. धारवाड व मंगलोर येथे सर्व देशी भाषांस गळफास लावणारी इंग्रजी, देशी भाषांस जितकी वाव देईल तेवढी घेऊन कानडी वाङ्मय कसें बसें वाढत आहे. धारवाडच्या वाङ्मयावर मराठी भाषेच्या सान्निध्यानें मराठी भाषेचा परिणाम होतो. त्यांतील मुख्य हा कीं ज्या शास्त्रीय संज्ञा व अर्वाचीन गोष्टीचे निदर्शक जे संस्कृत भाषेच्या पायावर रचलेले शब्द मराठींत वापरले जातात त्यांचा प्रसार कानडी भाषेंत होतो. शिवाय मराठी नाटकें, कादंबर्या यांची भाषांतरें याच केंद्रांत तयार होतात.
मंगलोर येथें कानडी वाङ्मय निर्माण करणार्यांमध्यें सारस्वत ब्राह्मण बरेच आहेत. आणि त्यांच्या मानसिक वैशिष्ट्याचा आणि सामाजिक स्थितीचा कानडी वाङ्मयावर थोडासा परिणाम होतो.
कवि राजमार्गाच्या (इ.स. ८५०) अगोदरचे लेखक - ज्याचा काल ज्ञात आहे असा अगदी जुना कानडी ग्रंथ म्हणजे कवि - राजमार्ग हा होय. हा राष्ट्रकूट राजा नृपतुंग यानें रचला असें प्रतिपादण्यांत येतें. पण नृपतुंगाच्या फक्त देखरेखीखाली व आश्रयाखाली हा तयार झाला असावा. याचा खरा लेखक श्रीविजय नांवाचा नृपतुंगाच्या दरबारीं असलेला कवि होय. नृपतुंग हा मान्यखेतच्या गादीवर इ.स. ८१४ ते ८७७ पर्यंत होता. तेव्हा नवव्या शतकाचा मध्य हा कानडी साहित्याचा प्रारंभ काल होय.
तथापि त्याच्या पूर्वीच्या शतकांतून होऊन गेलेल्या पुष्कळ प्राचीन लेखकांविषयी बरीच माहिती उपलब्ध आहे. कविराजमार्गांत सुद्धां आठ दहा गद्यपद्यलेखकांचा नामनिर्देश केला असून असे अनेक आहेत असें त्यांत म्हटलें आहे. ज्यांचीं नांवे दिलीं नाहीत अशा कांही कवीच्या दृष्टांतिक कविता घेऊन त्यांवर बराच उहापोह केला आहे. याशिवाय हा ग्रंथच मूळ कविकृतीवर चर्चा करण्यासाठी केला असल्यानें काव्यवाङ्मय किती जुनें आणि लोकमान्य झालें होतें याला हा ग्रंथच साक्षीभूत आहे.
जुन्या कानडी लेखकांनी आपल्या मागें होऊन गेलेल्या तीन महान कवींचा वारंवार उल्लेख केलेला आढळून येतो. हे कवी म्हणजे समंतभद्र, कविपरमेष्ठि आणि पूज्यपाद हे होत. कविराजमार्गांत यांचा उल्लेख नाही. यांचे फक्त संस्कृत ग्रंथ माहीत आहेत; पण कानडींत त्यांनी कांही रचना केली आहे की नाही याविषयी माहिती मिळत नाही. पण ज्याअर्थी कानडी लेखकांनी त्यांचा गौरवानें एकसारखा नामनिर्देश केला आहे, त्याअर्थी त्यांनी कानडीतहि कांही रचना केली असावी हें संभवनीय वाटतें. आतां यांच्याविषयी आपणाला काय माहिती आहे हें पाहूं.
जैनकथानुसार समंतभद्राचा काल दुसर्या शतकांत धरला आहे. तो बडा विवादक असून चांगला जैनधर्मोपदेशकहि होता. पाटलीपुत्र (पाटणा), थक्क (पंजाब) सिंध, माळवा, करहाटक (कर्हाड), वाराणसी, कांची इत्यादि स्थळी त्यानें प्रवास केला होता.
कांचीच्या देवळांत कांही चमत्कार घडवून आणून यानें कांचीचा राजा जो शिवकोटि याला शैवधर्म टाकून जैन धर्माचा स्वीकार करावयास लाविलें. याच्या कांही संस्कृत ग्रंथांवरील प्राचीन कानडी टीका उपलब्ध आहेत, पण याचा एकहि कानडी ग्रंथ उपलब्ध नाही.
पूज्यपादाचें दुसरें नांव देवनंदी. हा तळकादच्या गादीवर इ.स. ४८२-५२२ पर्यंत असलेल्या दुर्विनीत नांवाच्या गंग राजाचा गुरू असावा. तेव्हां याचा काल पांचव्या शतकाच्या अखेरीस जातो. हा जैन मूनि असून योगसाधनी होता. योग्यासारखी अद्वितीय शक्ति याच्या ठायी होती असें सांगतात. त्यानें जैन तत्वज्ञानावर ग्रंथ केले आहेत. पण त्याची जी ख्याति आहे ती त्याच्या व्याकरणग्रंथामुळें होय. ''पाणिनिशब्दावतार'' म्हणून त्यानें पाणिनीवर टीकाग्रंथ लिहिला, इतकेंच नव्हे तर त्यानें ''जैनेंद्र'' नांवाचें सर्वश्रुत संस्कृत व्याकरण रचिलें. वज्रनंदी नांवाच्या याच्या शिष्यानें मदुरेस एक तामिळ संघ स्थापिला असें म्हणतात.
कविपरमेष्ठीविषयी फारच थोडी माहिती आढळते. तो चवथ्या शतकांत होऊन गेला असावा. कविराजमार्गात उल्लेखिलेला कवीश्वर आणि चामुंडराय (९७८) व नेमिचंद्र (११७०) यांनी स्तविलेला कविपरमेश्वर ही याचीच नांवे असावीत.
वरील ग्रंथकारांनी कानडींत ग्रंथ रचना केली की नाही हें जरी माहीत नाही तरी दुसर्या कित्येकांनी केल्याचें नक्की माहीत आहे. यापैकी श्रीवर्धदेवाचा विशेष उल्लेख केला पाहिजे. जन्मभूमीवरून याला तुमुलूराचार्य असें नांव पडलें. यानें तत्वार्थमहाशास्त्रावर टीका म्हणून, ९६००० श्लोकांचा ''चूडामणि'' नांवाचा एक फार मोठा ग्रंथ लिहिला या ग्रंथाचें महत्व खालील दोन गोष्टीवरून दिसेल. इ.स. ११२८ च्या खोंदीव लेखांत सहाव्या शतकांतल्या दंडी कवीचा एक श्लोक आहे. त्यांत त्यानें श्रीवर्धदेवाची स्तुति केलेली आढळते. भट्टाकलंक (१६०४) नांवाच्या प्रसिद्ध कानडी वैय्याकरणानें ''चूडामणीची'' फार प्रशंसा करून, त्यावरून कानडी वाङ्मयाची किंमत व दर्जा चांगला कळून येईल असें ध्वनित केलें आहे. जर वरील शिलालेखांतील श्लोकचा कर्ता निःसंशय दंडी असेल तर श्रीवर्धदेव हा सहाव्या शतकाच्या मागें जाईल. याच्या ग्रंथांची प्रत उपलब्ध नाही हें दुर्दैव होय तथापि भट्टाकलंकाच्या वेळेपर्यंत हा ग्रंथ अस्तित्वांत होतासें दिसते.
ज्यांच्या कृती उपलब्ध नाहींत असे कविराजमार्गांत उल्लेखिलेले दुसरे प्राचीन ग्रंथकार म्हणजे विमल, उदय, नागार्जुन, जयबन्धु, दुर्विनीत, श्रीविजय हे होत. ''कर्णाटक कविचरितें'' या ग्रंथांत याची त्रोटक माहिती आढळते. या ठिकाणी गुणानंदा (९ वें शतक) या तत्वज्ञान, व्याकरण व साहित्य यावरील ग्रंथकाराचाहि उल्लेख केला पाहिजे. ग्रंथकार दुर्विनीत व या नांवाचा (इ.स. ४८२-५२२ पर्यंत राज्यावर असलेला) गंगराजा या एकच व्यक्ती असाव्या असें दिसतें. तो शब्दावताराचा कर्ता देवनंदी पूज्यपाद याचा शिष्य असून यानें भारवीच्या किरातार्जुनीयांतील कठिण अशा १५ व्या सर्गावर टीका लिहिली, असें शिलालेखांतून याचें वर्णन आढळते. भारवीचा काल ६१० च्या पूर्वी केव्हांतरी असावा; पण तो जर कालिदासाचा समकालीन असेल तर त्याला पांचव्या शतकांत घालावा लागेल.
या प्रकरणांत उल्लेखिलेली कोणतीहि पुस्तकें जरी सध्यां पाहण्यांत नाहीत तरी अजूनहि कांही सांपडण्यासारखी आहेत; कारण अशीं कांही प्राचीन जैनग्रंथसंग्रहालयें आहेत की त्यांतील ग्रंथ अद्याप नीटसे माहीत झाले नाहीत; ते विजातीयांच्या दृष्टीस पडूं नयेत म्हणून खबरदारी घेण्यांत येते व कधीं कधीं ते जमीनींत पुरून टाकण्यांतहि येतात !
कविराजमार्गापासून लिंगायतसमुत्थानकालापर्यंतचे जैनलेखक (८५०-११६०) - कविराजमार्गाच्या पुढचा प्राचीन ग्रंथकार म्हणजे पहिला गुणधर्म होय. हा महेंद्रांतक ही पदवी धारण करणार्या बहुधा एरेयप्पा (८८६-९१३) नांवाच्या गंगराजाच्या पदरी होता. यानें हरिवंश किंवा "नेमिना पुराण" आणि "शूद्रक" नांवाचा ग्रंथ लिहिला.
दहाव्या शतकांतील तीन कवींनां तीन रत्ने म्हणून कधी कधीं संबोधीत. हे तीन कवी म्हणजे, पंप, पोत्र आणि रत्न हे होत. उत्तरकालीन कानडी कवी यांची फार स्तुति गातात. कानडी वाङ्मयाच्या इतिहासांत दहावें शतक कांहीसें ददैदीप्यमान दिसतें या शतकांत त्याला मान्यखेत येथील आणि गंग राजांचा आश्रय होता.
पंप हा इ.स. ९०२ मध्यें जन्मला. याला आदिपंप असें म्हणतात. याच्या नंतर दुसरा एक पंपकवि झालेला आहे. हा वेंगी येथील एका ब्राह्मण घराण्यांतला होता. पण त्याच्या बापानें ब्राह्मणधर्म सोडून देऊन जैन धर्माचा अंगिकार केला. पंप हा चालुक्य घराण्यांतील अरिकेसरी नांवाच्या एका राजपुरूषाच्या पदरी होता. त्यानें याला धर्मपुर नांवाचें गांव बक्षिस दिलें. इ.स. ९४१ मध्यें या कवीनें एका वर्षात दोन काव्यें रचिली. ही काव्यें फार प्रख्यात असून कानडी वाङ्मयांत ती भाषासरणीच्या दृष्टीनें नमुन्यादाखल आहेत. पहिलें आदिपुराण, यांत पहिल्या तीर्थंकराचें चरित्र आहे. दुसरें विक्रमार्जुनविजय, यालाच पंपभारत असें नांव आहे. यांत पांडवजन्मापासून कौरवनाश व अर्जुनाभिषेक येथपर्यंतची भारतकथा वर्णिली आहे. यांत संस्कृत शब्द कमी असूनहि हे फार सरस वठलें आहे. यांतील अर्जून हा कवीचा आश्रयदाता अरिकेसरी असें कल्पून, कवीनें याला विष्णु, शिव, सूर्य, मदन इत्यादि विशेषणें देऊन चांगलेंच गौरविलें आहे. तथापि या अवास्तव्य स्तुतीमुळें काव्याला जरा कमीपणा येतो.
पोन्न हा जैनकवि पंप याचा समकालीन होता. हा संस्कृत व कानडी या दोनहि भाषांत ग्रंथरचना करीत असे; व त्यावरून याला उभय-कवि-चक्रवर्ति अशी बहुमानाची पदवी मिळाली होती. मान्यखेतच्या गादीवर ९३९-९६८ पर्यंत असलेल्या कृष्णराज नांवाच्या राष्ट्रकूट राजानें त्याला ही पदवी अर्पण केली होती. या कवीची ख्याति यानें रचिलेल्या शांतिपुराणावरून झाली. या पुराणांत १६ तीर्थंकरांच्या कथा आहेत. याचा दुसरा ग्रंथ म्हणजे ''जिनाक्षरमाले'' हें जिनस्तुतिमय विवक्षिताक्षरबंध काव्य होय. याच्या नांवानें प्रसिद्ध असलेले दुसरे ग्रंथ उपलब्ध नाहीत.
त्रैमूर्तीतील तिसरा जो रन्न हा कासार जातीचा वैश्य होता. मोहक भाषा सरणी, काव्यौघ व कौशल्य हे गुण त्याच्या काव्यांत आढळून येतात. दहाव्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेलेल्या पश्चिम चालुक्य राजांचा त्याला आश्रय असे. या कवीचा पहिला ग्रंथ ''अजित पुराण'' हा होय. यानें हा दुसर्या तीर्थंकराचा इतिहास ९९३ मध्यें लिहिला. याचा दुसरा ग्रंथ ''साहस भीमविजय''. यांत भीमाने दुर्योधनाला मारण्याविषयी केलेली प्रतिज्ञा कशी शेवटास नेली याविषयीं कथा आहे. याचे दुसरे ग्रंथ उपलब्ध नाहीत.
रन्नचा आश्रयदाता आणि ''तीन रत्नां'' चा समकालीन चावुंडराय (सं. चामुंड) हा स्वतःच लेखक होता. हा गंगराजा चवथा राचमल्ल (९७४-९८४) याचा एक मंत्री होता. हा चांगला योद्धाहि असे. यानेंच अलोट पैसा खर्च करून श्रवण बेळगोळ येथें गोमतेश्वराचा अजस्त्र पुतळा उभारला. ''त्रिषष्टिलक्षण महावीरपुराण'' किंवा ''चामुंडरायपुराण'' या नांवानें ओळखिला जाणारा याचा एक गद्य ग्रंथ आहे. यांत २४ तीर्थकरांचा संपूर्ण इतिहहास आहे. हा ग्रंथ विशेष मनोरंजक व महत्वाचा असण्याचें कारण सबंध गद्यांत लिहिलेला जुना उपलब्ध असलेला गद्यग्रंथाचा नमुना काय तो हाच आहे. दहाव्या शतकांत प्रचलित असलेल्या भाषेचें ज्ञान आपणास या ग्रंथावरून करून घेतां येतें. याचा काल ९७८ हा आहे.
इ.स. ९८४ च्या सुमारास पहिला नागवर्म, या प्रख्यात वैय्याकरणानें ''छंदोम्बुधि'' हा कानडी छंदःशास्त्रावरील ग्रंथ रचला. कर्त्यानें हा आपल्या पत्नीस संबोधून लिहिला असून प्रत्येक श्लोक त्या त्या वृत्ताचें उदाहरण म्हणून रचला आहे. बाणाच्या संस्कृत कादंबरीवरून यानें चंपूमध्यें कानडी ''कादंबरी'' केली आहे. याला चाबुंडरायाचा आश्रय होता.
अकराव्या शतकांतले कानडी ग्रंथकार फारसे नाहीत; याचें कारण त्यावेळी चोल राजांच्या स्वार्यामुळें देशांत फार अस्वस्थता होती. देश उध्वस्त केला गेला असून पुष्कळ जैन देवस्थानें पार नाहींशी करून टाकण्यांत आलीं होती.
चोल स्वार्या थांबल्यानंतर १०७९ साली चंद्रराजानें ''मदनतिलक'' नांवाचें एक लहानसें काव्य रचिलें. हें अशा खुबीदार रीतीनें रचिलें आहे की, ध्वनि व शब्द यांच्या अनेक वाङ्मयविक्षेपांनी याचे निरनिराळे प्रकार करून दाखवितां येतात. अनेक तऱ्हांनी हें म्हणतां येतें.
याच वेळी बलिपुर (शिमोगा जिल्ह्यांतलें बेलगामी) येथें नागवर्माचार्य उदयास आला. यानें त्या ठिकाणी देवळें व स्नानासाठी घाट बांधिले आहेत. हा फार धार्मिक असे. याचा ''चंद्रचूडामणिशतक'' हा ग्रंथ वैराग्यपर आहे. याला केव्हां केव्हां ''ज्ञान-सार'' असेंहि संबोधण्यांत येतें.
नागचंद्र किंवा अभिनवपंप हा ११०० च्या सुमारास होऊन गेला. याची लेखनशैली व याच्या एका ग्रंथाचें अपूर्व महत्व या दृष्टीनें याचा प्रामुख्यानें उल्लेख केला पाहिजे. याचें वैयक्तिक चरित्र फारसें माहीत नाही. यानें ''मल्लिनाथपुराण'' लिहिलें. यांत १९ साव्या तीर्थंकराची कथा असून, यांत कवीची वर्णन करण्याची अपूर्व शक्ति दृष्टोत्पत्तीस येते. तथापि याच्या ''रामचंद्रचरित्रपुराणाला'' विशेष मान्यता प्राप्त झालेली आहे. हा ग्रंथ ''पंपरामायण'' या नांवानें ओळखिला जात असून कवीनें आदिपंपाच्या पंपभारताला लोलक म्हणून हा तयार केला. हा ग्रंथ अद्वितीय व मौल्यवान असा आहे. या योगानें रामायणाचें, ब्राह्मणी पाठाहून पुष्कळ प्रमुख बाबतींत निराळें असें जैन पाठांतर आपणांस पहावयास मिळतें. या कथेंतील मुख्य धागा वाल्मिकीरामायणांतलाच असून इतर सर्व गोष्टींत फार फरक पडलेला आहे. विशेष लक्ष्यांत घेण्याजोगे कांही फरक खाली देतो :-
सर्व वातावरण जैन आहे. सबंध हिंदुस्थान जैन प्रदेश बनलेला दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. ब्राह्मण किंवा ब्राह्मणी धर्म याचा कोठेंहि उल्लेख नाही. वनांतील ॠषी हे जैन यती होत. राम, रावण वगैरे सर्व मंडळी जैन असून, अंतकाळी ते बहुतेक जैन यती बनतात. राक्षसांनां राक्षस या नांवानें फार थोड्या वेळां संबोधण्यांत येतें. त्यांनां बहुधा विद्याधर असें म्हणत. वस्तुतः पृथ्वीवर राहाणार्यांचे दोन वर्ग पाडण्यांत आले होते, एक खेचर व दुसरा भूचर, म्हणजे जिन आणि मानव, अशा दोन जाती कल्पिल्या आहेत. ब्राह्मणी कथेंतील अमानुष (दैवी) व विलक्षण चमत्कारांऐवजी यांत सरळ साधी व अधिक विश्वसनीय कथा आढळून येते. उदाहरणार्थ, सुग्रीव, हनुमंत व त्यांचे अनुयायी हीं वानर नसून त्यांच्या ध्वजावर वानरचिन्ह असे. कदंबांच्या ध्वजावरहि वानर-चिन्ह असून त्यांनां वानरध्वज असें नांव होतें. या ग्रंथांतील वान मनुष्यप्राणी होते. पर्वताच्या मोडलेल्या शिखरांनी समुद्रावर लंकेला पूल बांधला नव्हता. तर ''नभोगमनविद्येच्या योगानें अंतरिक्षांतून पुलावरून आणल्याप्रमाणें सैन्य समुद्रपार करण्यांत आलें. रावणाला ''दशमुख'' हें जें नाव मिळालें याचें कारण त्याला खरोखरीच दहा मुखें होती म्हणून नव्हे तर तो जेव्हां जन्मला तेव्हां त्या खोलीत असलेल्या रत्नादर्शाच्या दहा पैलूमंधें त्याचें मुख प्रतिबिंबित झालें होते म्हणून.
राम व लक्ष्मण हे विष्णूचे अवतार नसून केवळ ''कारण पुरूष'' होते. शेवटी आठवे अवतार वासुदेव व बलदेव यांशी त्याचें अनन्यीकरण करण्यांत आलें आहे. लक्ष्मणाला कृष्ण, केशव, अच्युत असें म्हटलें आहे. सबंध वनवासांत तो रामाच्या बाजूचा योद्धा व रक्षक असून सर्व मोठमोठ्या गोष्टी यानेंच केल्या आहेत. आणि शेवटी रावणहि याच्याच शस्त्रप्रहारानें मारला जातो.
बारीकसारीक गोष्टी व प्रसंग वाल्मिकीरामयणांतल्यापेक्षां अगदीच भिन्न आहेत. उदाहरणार्थं, लक्ष्मण व शत्रुघ्न हे सहोदर नव्हते. रामाच्या आईचें नांव कौसल्या नसून अपराजिता असें आहे. सीतेला प्रभामंडळ नांवाचा एक जुळा भाऊ होता. तो लहानपणींच चोरीस गेला असून, सीतास्वयंवराच्या पणांत तो भाग घेऊं लागला असतांना हें नातें उघडकीस आलें. रावण हा देवगंधर्वादिकांनां अजिंक्य होता असें कोठेंच सांगितलें नाही.
रामायणाची दुसरी जैनपाठांतरें कानडीत आहेत. त्यांपैकी प्रमुख शतपदींत बसविलेलें ''कुमुदेंदु रामायण'' (१२७५) आणि देवचंद्र (१७९७) याचा ''रामकथावतार'' हा गद्यप्रबंध ही होत. ''चावुंडरायपुराण'' (९७८), नयसेनाचें ''धर्मामृत'' (१११२) आणि नागराजाचें ''पुण्याश्रव'' (१६३१) या ग्रंथांतून रामायणकथा त्रोटक दिलेली आहे. यांची सविस्तर तुलना करणें मौजेचें होईल.
या कथेच्या मुळासंबंधी जैनकथा अशी आहे की, ही प्रथम वृषभसेनानें भरताला सांगितली; नंतर ॠषिसमुदायाचा अग्रणी जो गौतम यानें इ.स. पूर्वी ५२७ मध्यें शेवटचा वर्धमानतीर्थंकर याच्या देखत ती मगध राजाला निवेदन केली; यावेळपासून अव्याहत गुरूपरंपरेमार्फत ती आतांपर्यंत चालत आली आहे.
नागचंद्राच्या वेळेचे दुसरे कवी म्हणजे कांति व राजादित्य हे होत. कांति ही ज्ञात असलेली पहिली कानडी कवियित्री होय. ती जैन होती. ''कांति'' हें नांव जैन परिव्राजिकांनां किंवा स्त्रीभक्तांनां लावण्यांत येतें. द्वार-समुद्राचा बल्लाळराजा तिचें कवित्व कसोटीला लावण्यासाठी नागचंद्रानें म्हटलेला श्लोकार्ध तिला पुरा करण्यास सांगे व ती त्याप्रमाणें चटकन करी, अशी तिच्याविषयी एक आख्यायिका आहे. दुसरी अशी एक गोष्ट सांगतात कीं, एकदां नागचंद्रानें तिच्याकडून आपली छंदोबद्ध स्तुति करवून घेण्याबद्दल पैज मारली, व ही पैज जिंकण्यासाठी त्यानें मूर्च्छा आल्याचें निमित्त करून मेल्याचें सोंग घेतलें. तेव्हां कांतीला शोक होऊन ती त्याचें गुणसंकीर्तन करूं लागली असतां त्याने चटकन उठून पैज जिंकल्याचें जाहीर केलें.
राजादित्य हा पाविनबागेचा जैन होता. त्यानें आपली काव्यप्रतिभा गणितविषयाचें विवेचन करण्याकडे लाविली. अंकगणित, क्षेत्रमापन व यासारखेच इतर गणितविषय यांच्या संबंधीचे नियम आणि सिद्धांत मोठ्या कौशल्यानें यानें पद्यांत गोंविले आहेत. या विषयांवरील कानडीभाषेंत त्याचे ग्रंथ पहिलेच होत.
बाराव्या शतकांत खालील ग्रंथकारांचा उल्लेख केला पाहिजे :- (१) नयसेन (१११२) याने एक व्याकरण लिहिलेलें आहे पण तें उपलब्ध नाही. याची कीर्ति ''धर्मामृत'' नांवाच्या नीतिग्रंथावरून झाली. या ग्रंथांतल्या चौदा प्रकरणांतून यानें धैर्य, सत्यता, सदवृत्त, न्याय इत्यादि सद्गुणासंबंधी सोप्या व मजेदार भाषेंत विवेचन केलें आहे. यानें प्रस्तावनेंतच संस्कृतपरिभाषा वापरण्याचा इतर कवींत जो दोष असतो तो टाळल्याचें लिहिलें आहे. हा याचा ग्रंथ १११२ साली धारवाड जिल्ह्यांत मुलुगंद येथें लिहिला गेला. (२) दुसरा नागवर्मा - (सुमारे ११२०) हा ''काव्यावलोकन'' आणि ''कर्णाटक भाषाभूषण'' या दोन महत्वाच्या व्याकरणग्रंथांचा कर्ता होय. तो मूळ वेंगीचा असून कानडी देशांत येऊन राहिला होता. (३) ब्रह्मशिव - (११२५) यानें आपल्या समयपरीक्षाग्रंथांत जैनेतर धर्मांतील दोष दाखवून जैनबाजू उचलून धरली आहे. (४) कीर्तिवर्मा (११२५), यानें गोवैद्य नांवाचा गुरांच्या रोगासंबंधी एक पद्यग्रंथ लिहिला आहे. (५) कर्णपार्य (११४०), यानें दुसर्या अनेक ग्रंथाखेरीज नेमिनाथ पुराण म्हणजे २२ व्या तीर्थकराचें चरित्र लिहिलें. यांत त्यानें कृष्ण, पांडव, भारतीय युद्ध इत्यादि कथा घुसडण्याचा प्रयत्न केला आहे. (६) वृत्तविलास (११६०) - यानें अमितगतीच्या संस्कृत ग्रंथांचे धर्मपरिक्षे नांवानें एक कानडी रूपांतर केलें आहे. यांत हिंदू देवांचे अनेक दुर्गुण दाखवून त्यांची पुराणें किती अविश्वसनीय असतात हें सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. कोणताहि देव कुमारीरक्षक होण्याच्या लायकीचा नाही हें यांत दाखविलें आहे. (७) दुर्गसिंह (११४५) - हा जैन नसला तरी त्याचा या ठिकाणी उल्लेख करणें बरें. हा किसुडकाडु-नाड मधील सय्यदी गांवचा स्मार्त ब्राह्मण होता. यानें गुणाढ्याला अनुसरून चंपूमध्यें ''पंचतंत्र'' लिहिलें आहे.
लिंगायत संप्रदायाचा उदय - (इ.स. ११६०) बसव आणि लिंगायतपंथाचे प्रचारक :- बसव हा लिंगायतमताचा संस्थापक नसून, त्याचा सुधारक व प्रचारक होता. लिंगायत संप्रदायास त्या संप्रदायाचे लोक वीरशैव धर्म म्हणतात व तो पंचाचार्यांच्या उपदेशावर रचला आहे व तो वेदोक्त धर्म आहे असें त्याचे अनुयायी समजतात. बसवाची सर्व कृत्यें धर्मसंमत होती असा कोणाचाच आग्रंह नाही आणि बसवचरित्र आज स्पष्ट उपलब्ध आहे असेंहि कोणी मानीत नाहींत. कांही स्थूल गोष्टी तेवढ्या सांगतां येतील. बसवावर ख्रिस्तीमताचाहि परिणाम झाला होता असें कित्येक म्हणतात. तो कलादगी जिल्हयांत बागवाडी येथें जन्मला पण कृष्णा व मलप्रभा यांच्या संगमावर असलेल्या कप्पदि गांवी तो राहात असे. तेथें एक संगमेश्वराचें स्थान आहे. या ठिकाणी त्याला वीरशैवमताची पुनर्जागृति करण्यास अनुज्ञा मिळाली, असें सांगतात. बसव आराध्य ब्राह्मण होता. त्याची पहिली बायको ही कल्याण येथें ११५६-११६७ पर्यंत गादीवर असलेल्या विज्जल नांवाच्या कलचुरी राजाचा दिवाण जो बसवाचा मामा होता, त्याची मुलगी होय. जेव्हां त्याचा सासरा वारला तेव्हां बसवाला दिवाणगिरीची वस्त्रें मिळाली. बसवाचा चन्नबसव नांवाचा एक भाचा होता; त्याच्या मदतीनें आपल्या नवीन मताचा व शिवोपासनेच्या नवीन मार्गाचा प्रसार करण्यास बसवानें आरंभ केला. लवकरच त्यानें पुष्कळ अनुयायी जमविलें व जंगमाचा पुरोहितवर्ग स्थापला. या जंगमांचे पोषण राजाच्या खजिन्यांतून केल्याच्या आरोपावरून बसवाला पकडण्याचा जेव्हां हुकूम सुटला तेव्हां त्यानें पळून जाऊन आपल्या अनेक अनुयायांच्या साहाय्यानें राजाचा पराभव केला. यावर राजानें त्याला पुन्हां दिवाण केलें पण यापुढें खरा सलोखा न राहतां, बसवानें राजाला मारविलें. तेव्हां राजपुत्रानें बापाबद्दल सूड घेण्याच्या इराद्यानें त्याचा एकसारखा पाठलाग केला तेव्हा बसवानें अखेरीस विहिरीत उडी घेतली. लिंगायतांच्या मतें, तो संगमेश्वराला पळून जाऊन तेथील शिवलिंगांत गडप्प झाला. यांच्या मागून चन्नबसव हा लिंगायतांचा पुढारी झाला.
बसवाच्या नांवाभोवती अनेक अख्यायिका जमा होऊन त्यांची पुराणें बनली. 'बसव पुराण' (१३६९), 'महाबसवपुराण' (१५ वें शतक) आणि 'वृषभेंद्रविजय' (१६७१) हीं ती पुराणें होत; 'राजशेखरा' चा कर्ता षडक्षरिदेव यानें हें शेवटचें पुराण रचिलें आहे. बसवाला नन्दीचा अवतार मानण्यांत येतें. बसवानें रचिलेले म्हणून मानण्यांत येणारे ग्रंथ, 'षट-स्थल-वचन', 'काल-ज्ञान-वचन', 'मन्न-गोप्य', 'घटचक्र-वचन' आणि 'राज-योग-वजन' हे लिंगायतमतांचे निरूपण करणारे ग्रंथ होत.
मतप्रसाराच्या कामांत बसवाला अनेक लेखकांची मदत होती. त्यांनी या नवीन पंथाची प्रशंसा व विवरण करणारी पुस्तकें देशभर फैलाविली. हीं पुस्तकें सर्वांस समजण्यासारख्या सोप्या गद्यांत किंवा सहज कळण्यासारख्या व गळ्यावर म्हणतां येण्याजोग्या सोप्या पद्यांत असल्यानें या मताचा प्रसार फारच जलदीनें झाला. पुस्तकांची नांवे सोपी व आंतील विषयांनां आदर्शासारखी होती आणि पुष्कळदां तीच तीच नांवे देण्यात येत, उदा. ''षट-स्थलवचन'' किंवा ''कालज्ञान-वचन'' हेंच नांव निरनिराळ्या लेखकांनी या विषयावर लिहिलेल्या पुस्तकांनां देण्यांत येतें.
वीरशैवपंथाचे प्रचारक अनेक आहेत. तेव्हा सर्वांची नांवे देतां येण्यासारखी नाहींत. नीलम्मा हें बसवाच्या अनेक बायकांपैकी एकीचें नांव प्रचारकांमध्यें पाहून नवल वाटेल. चन्नबसव हा बसवाचा फारच मोठा सहकारी असे. बसव जिवंत असतांना देखील चन्न काही बाबतींत आपल्या मामापेक्षा श्रेष्ठ होता आणि या चळवळीचा धार्मिक भाग प्रमुखत्वानें चन्नाच्याच देखरेखीखाली होता. वीरशैवपंथाची मतें बसवाला शिकविण्यासाठी प्रणवा ( ॐ ) नें त्याच्या (चन्नाच्या) ठिकाणी अवतार घेतला होता असें सांगतात, म्हणून साहजिकच बसव नंदीचा अवतार असून, चन्नबसव साक्षात शिव होता असें समजतात.
बसवाचे दुसरे प्रमुख सहकारी म्हणजे मडिवाल मचय्य, प्रभुदेव आणि सिद्धराम हे होत. ''चन्नबसवपुराण'' (१५८५), ''मडिवालय्य सांगत्य'', ''प्रभुलिंगलीले'' (१४६०), ''सिद्धरामपुराण'' आणि इतर कांही ग्रंथ यांतून वरील धर्मप्रवर्तकांबद्दलच्या आश्चर्यकारक व चमत्कारिक कथा सांगितल्या आहेत.
लिंगायत संप्रदायाची थोडी माहिती - बाराव्या शतकांत बसवाबरोबर हा संप्रदाय उत्पन्न झाला असें नसून तो प्राचीन कालापासून चालत आलेला आहे. बसवानें फक्त त्याची सुधारणा व प्रसार केला. लिंगायतलोक केवळ शिवाची उपासना करितात, पण त्यांचें शैवांशी साम्य नाही. केवळ शिवोपासना हें त्यांचें वैशिष्टय नसून अंगावर कोठे तरी नेहेमीं लिंग धारण करणें हेंच त्यांचे वैशिष्टय आहे. हें लिंग (देव) चिन्ह बहुधां चांदीच्या किंवा लाकडी करंड्यांत (करडिगे) घालून गळ्यांत अडकवितात. जंगम तें आपल्या डोक्यावर धारण करितात. हें लिंग कोणत्याहि सबबीखाली आपल्या पासून दूर करावयाचें नाही. लिंगायत लोक मोठे कडक शाकाहारी असतात. हे ब्राह्मणांचें वर्चस्व मानीत नसल्यानें ब्राह्मणांत व यांच्यांत वैर दिसून येतें. लिंगायत समाजांत कोणीहि मनुष्य जातिबाह्य असला तरी तो जातीत घ्यावा अशी बसवाची त्यांना शिकवण आहे.
यांचे कांही धर्मग्रंथ संस्कृतांत असून त्यांत २८ ''शैवागम'' नांवाचे ग्रंथ येतात. शिव-गीतेलाहि मोठा मान देण्यांत येतो. अशिक्षितांकरिता कानडीत '' वचनें'' तयार केली आहेत. यांत लहान लहान गद्यमय उपदेशपाठ असतात. बसवपुराण व चन्नबसवपुराण यांना फक्त अशिक्षित लोकच प्रमाण मानतात.
वीरशैवसंप्रदायाची मुख्य तत्वें व आचार, ''अष्टावरणम'' व ''षटस्थल'' या पारिभाषिक शब्दांत देतां येतील. अष्टावरणांत (१) गुरूची आज्ञा पाळणें, (२) लिंगपूजा, (३) जंगमाविषयी आदर, (४) विभूति लावणें, (५) रूद्राक्षमाळा धारण करणें, (६) पादोदक घेणें, (७) प्रसाद भक्षण करणें (नैवेद्य दाखवून), (८) ''नमः शिवाय'' हीं पंचाक्षरें जपणें (याला ''ओम'' जोडल्यास ही षडक्षरें होतात.) या आठ गोष्टी येतात. या गोष्टी धर्मश्रद्धेला सहाय्यभूत म्हणून आहेत. षटस्थल किंवा मोक्षाच्या सहा पायर्या म्हणजे :- भक्त, महेश, प्रसादि, प्राणलिंगि, शरण, व ऐक्य. शेवपंथाच्या ६३ जुनाट साधूं (यांनां 'पुरातन' असें म्हणतात.) विषयीं व पुढील काळांतील ७७० साधूं ('नूतन पूरातन') विषयी यांच्यांत आदरबुद्धि बाळगण्यांत येते. बसव व त्याचे प्रमुख अनुयायी 'नूतन पुरातनांत' येतात. या पंथाचे तत्वज्ञानांतील स्थान ब्राह्मणांच्या एकेश्वरी सारख्या पंथांच्या जोडीला लागेल. शिवाला परब्रह्म कल्पून त्याला शिवतत्व किंवा महा-शिव असें संबोधण्यांत येतें. हें तत्व ब्रह्मा, विष्णु व रूद्र या वैय्यक्तिक देवतांपेक्षा श्रेष्ठ आहे.
लिंगायत ग्रंथकार - (११६०-१६००) अगदी पहिल्या लिंगायत ग्रंथकार हरीश्वर किंवा हरिहर हा नरसिंह बल्लाळाच्या कारकीर्दींत हळेबीड येथें मुख्य मुलकी हिशेबनीस असे. याची अशी आख्यायिका सांगतात की, हिशेब देण्यास याला राजानें बोलाविलें असतां, हंपीच्या विरूपाक्ष मंदिरांत आपण आरती करीत असतांना सर्व हिशेब अचानक जळून खाक झाले असें यानें राजास सांगितले. यावरून त्याला बडतर्फ करण्यांत आलें. यापुढें त्यानें विरूपाक्ष मंदिरांत राहून आपले ग्रंथ लिहिले. याचा पहिला ग्रंथ ''रगळे'' हा असून, त्यांत ६३ पुरातनांची प्रशंसा आहे. त्याला ''शिवगणद रगळे'' किंव प्रथम प्ररातनाच्या नांवावरून ''गंबियण्णन रगळे'' असें नांव आहे. लहान लहान पद्यांपेक्षा ज्यास्त उच्च उर्जाची ग्रंथरचना यास करतां यावयाची नाही अशी लोकांची समजूत झालेली पाहून, यानें ''गिरिजाकल्याण'' किंवा ''शिवपार्वतीविवाह कथा'' हा ग्रंथ मोठी आकांक्षा धरून लिहिला व लौकिकहि मिळविला. या ग्रंथाची फारच सुंदर व प्राचीन जैन तर्हेची धाटणी आहे व पुढील कवीनीं याची मोठी प्रशंसा केलेली आढळतें. हंपीच्या विरूपाक्षाप्रीत्यर्थ ''पंपाशतकम'' हा ग्रंथ यानेंच रचिला.
राघवांक :- हा हरीश्वराचा शिष्य होता. हा हंपीचा रहिवासी, पण यानें द्वारसमुद्र व वारंगळ दरबारी जाऊन विजय मिळविले व आपल्या आयुष्यातील शेवटचे दिवस हसन जिल्ह्यांतील बेलुर गांवी कंठिलें. यानें हरिश्चंद्रकाव्य लिहिलें तेव्हां त्यांत एका वैष्णव राजाची स्तुति गाइल्याबद्दल हरीश्वर त्याच्यावर नाराज झाला. तेव्हां, त्याचें परिमार्जन करण्याकरितां म्हणून राघवांकानें ''सोमनाथचरित्रे'' ''सिद्धमपुराण'' ''हरिहरमहत्व'' यांसारखे आणखी ग्रंथ लिहिले. षटपदीत लिहिण्यास यानेंच प्रथम सुरवात केली असें सांगतात. षटपदीरचना पुढें फार लोकप्रिय झाली. सोळाव्या शतकांत चिक्कनंजेशानें ''राघवांक'' नांवाचें या ग्रंथकाराचें चरित्र लिहिलें.
केरेय पद्मरस :- याला ''केरेय'' (तळे बांधणारा) हें उपपद मिळण्याचें कारण यानें बेलुर नांवाचें तळे बांधविलें हें होय. तो कांही काळ नरसिंह नांवाच्या बल्लाळराजाचा मंत्री होता. यानें वीरशैवसंप्रदाय चांगला वाढविला. यानें ''दीक्षा बोधे'' नांवाचें संवादात्मक एक काव्य केलें आहे. त्यांत एक गुरू आपल्या शिष्याला उपदेश करीत आहे, व शैव पंथाची तत्वें पढवीत आहे असें आहे. १३८५ च्या सुमारास त्याच्या एका वंशजानें लिहिलेल्या ''पद्मराजपुराणां'' तील हा नायक आहे. याच्या कुमारपद्मरस नांवाच्या मुलानें ''सानंदचरित्रे'' हा ग्रंथ लिहिला असून त्यांत एका ॠषीच्या मुलानें नरकांतील मृतांच्या यातना ऐकून ''पंचाक्षरी'' च्या प्रभावानें त्यांना दुःखमुक्त करण्याचा कसा प्रयत्न केला हें सांगितलें आहे. मूळ संस्कृतावरून हा कथाभाग घेतला असें म्हणतात. हरीश्वर, राघवांक व केरेय पद्मरस यांचा काळ १२ व्या शतकांतील कीं १३ व्या शतकांतील आहे हें निश्चित झालें नाही.
पालकुरिके सोम :- (११९५) हा गोदावरी जिल्हांत पालकुरिके येथें जन्मला. आपल्या गांवांतील वैष्णव शास्त्रयांनां जिंकून तो कानडी प्रांतांत कल्लेय येथें गेला. याचें लेखन विशेषतः संस्कृत व तेलगू या भाषेंत फार आहे. याचें तेलगू ''बसव-पुराण'' भीमकवीच्या ''बसवपुराणाला'' आधारभूत झालें असें म्हणतात. याच्या कानडी ग्रंथांत एक ''शतक'' असून, कांही लोक तें प्रख्यात् ''सोमेश्वरशतक'' च असावें असें म्हणतात. ''सोमेश्वरशतक'' हा इतका विस्कळित व अशुद्ध ग्रंथ आहे कीं, पालकुरिकेसोमासारख्या संस्कृतज्ञानें तो लिहिला असेल हें संभवत नाहीं असें रा. नरसिंहाचार्यासारखे दुसरे कांहीं लोक प्रतिपादितात. शिवाय लिंगायत लोक स्वतःपालकुरिकेसोमानें केलेल्या ग्रंथांत या शतकाला जागा देत नाहींत; त्याचा लेखक आपणाला पालकुरीकेसोम म्हणवीत नसून पुलिगेरे (लक्ष्मेश्वर) येथील आपण रहिवासी आहों असें ध्वनित करतो.
देव कविः- (१२००) यानें ''कुसुमावलि'' नांवाची एक चंपूत सुंदर कांदबरी लिहिली आहे. एक राजकन्या व राजपुत्र एकमेकांच्या प्रतिमेवर अनुरक्त होऊन आपल्या प्रियजनाचा पुष्कळ कालपर्यत शोध लावितात. नंतर त्यांच्या गांठी पडून त्यांचें लग्न लागतें अशी यांत गोष्ट आहे.
सोमराजः- (१२२२) हा बहुधा पश्चिम किनांर्यावरील चौत राजांपैकी एक असावा. यानें लिंगायत धर्म स्वीकारला होता. याच्या ''शृंगार-रस'' ग्रंथांत, एक राजा नायक असून तो आपल्याबरोबर सर्व शहरवासीयांना कैलासाला घेऊन जातो असें दाखषवलें आहे.
ब स व पु रा ण - इ.स. १३६९ त भीमकवि उदयास येईपावेतों दुसरा कोणीही नांवाजण्यासारखा लिंगायत लेखक पुढें आला नाहीं. या कवीनें षट्पदी छंदांत लिहिलेलें ''बसवपुराण'' लिंगायतांत फारच लोकप्रिय झालें. ''बसव-पुराणां''त बसवाचें चरित्र व त्यानें केलेले अनेक चमत्कार रूढ पुराणकाव्याच्या पद्धतींत मनोरंजक रीतीनें ग्रथित केलेले आहेत. बसवाचे बोल इतके प्रभावशाली होते कीं, त्यायोगें विषाचें अमृत होई, मृत सजीव होई, अप्रबुद्ध मोठमोठ्या विद्वानांनांहि भारी होई, पर्वत चालूं लागत, आकाशांत सूर्य स्थिर होई, मृत सजीव होई, वाघीण दूध काढून देण्याइतकी गरीब होई अशा तर्हेच्या असंभवनीय गोष्टी आपल्या पंथाची प्रौढी दाखविण्यासाठीं इतर पुराणांतल्याप्रमाणें याहि पुराणांत आहेत. प्रभावसंपन्न शैवविधि आचरण्यानें-मग ते मनापासून आचरिले नसले तरी हरकत नाहीं'' इतक्या धंद्यांचे व घाणेरड्या जातीचे लोकहि पवित्र झाले आहेत अशा तर्हेचा उपदेश यांत अलंकारिक भाषेंत केलेला कधींकधीं आढळतो. यानंतर वरील विधानांच्या पुराव्यासाठीं म्हणून गोष्टी बनविल्या आहेत तेव्हां यावरून बसवानें केलेल्या अनेक चमत्कारांची कल्पना येईल. सरतेशेवटीं या पुराणांत संगमेश्वर येथील शिवाच्या देवालयांतील लिंगांत, बसव जसा त्यांतून आला तसा पुन्हां त्यांत मिळाला, असें दाखविलें आहे. यासंबंधी वर्णन मोठें काव्यमय आहे तें असें:-
''ज्याप्रमाणे वावटळीने वर उडविलेला धुळीचा लोट भूमीपासून वर निघून पुन्हां भूमींत नाहींसा होतो; दूध घुसळिलें असतां त्यावर फेंस येऊन पुन्हां जसा त्यांत जिरून जातो; जशी विजेची चमक आकाशांत उत्पन्न होऊन पुन्हां आकाशांतच अन्तर्धान पावते; ज्याप्रमाणें गारा पाण्यापासून तयार होऊन पुन्हां पाण्यांतच वितळून जातात, त्याप्रमाणें बसव गुरूच्या पोटीं येऊन शेवटी चिरकाळ विश्रांति घेण्यासाठी त्याच्याशी (ईश्वराशीं) सायुज्यता पावला''.
या युगांतील शेवटचे लिंगायतग्रंथकार - भीमकवीच्या काळांतीलच, ''पद्मराजपुराणाचा'' कर्ता पद्मणांक (३८५) होय. हा केरेय-पद्मरसाचा एक वंशज होता. पद्मराजपुराणांत या कवीनें केरेय-पद्मरस या त्याच्या पूर्वजानें २०० वर्षापूर्वी अन्य''धर्मीय आचार्यांवर मिळविलेल्या विजयांबद्दल त्याची स्तुति गायली आहे.
चौदाव्या व पंधराव्या शतकांतील खालील ग्रंथकार होतः- गुब्बीच्या मल्लनार्यानें (१३७०) ''वीरशैवामृत'', ''शिवभक्तरपुराण'', ''भावचिन्तारत्न'', किंवा ''सत्येन्द्रचोलकथे'' यासारखे अनेक ग्रंथ रचिले आहेत. "सत्येन्द्र चोलकथ" ला आधारभूत म्हणून पिळे नयनारनें ''ज्ञानसंबंधीत'' गायलेली सत्येन्द्रचोल नांवाच्या राजाची शिवभक्तिपर कथा घेतली आहे.
षट्पदींत लिहिलेल्या ''महाबसवचरित्रा''चा कर्ता सिंगिराज आणि तिसरा, ''प्रभुलिंग-लीले''चा कर्ता चामरस. प्रभुलिंगलीले हा ग्रंथ षट्पदींत आहे. त्याचा नायक प्रभुलिंग किंवा अल्लम-प्रभु असून तो बसवाचा एक सहकारी आहे. या ग्रंथात प्रभुलिंगाला गणपतीचा अवतार मानला आहे. एकदां पार्वतीनें त्याच्या संसारविरक्तीची परीक्षा पाहण्याकरितां बनवासे नावाच्या एका राजकन्येच्या ठायीं प्रभुलिंगाला तिनें मोह पाडावा म्हणून आपला कांही अंश घातला अशी एक त्यांत कथा आहे. हा ग्रंथकार विजयानगरच्या दुसर्या प्रौढदेवरायाच्या (१४४६-१४६७) दरबारी होता. याच राजानें त्याच्या ग्रंथाचें तेलगू व तामीळ भाषांत भाषांतर करवून घेतलें.
इ.स.१५८५ त ज्यावेळीं वैष्णवपंथ चांगल्या भरभराटींत होता पण विजयनगरचा पाडाव झाला होता, अशा वेळीं विरूपाक्ष पंडिताने षट्पदी छंदांत ''चन्नबसवपुराण'' लिहिलें. यांत चन्नबसवाचें चरित्र व माहात्म्य असून बराचसा भाग चन्नानें सोन्नलिगेच्या सिद्धरामाला वीर-शैवविद्येसंबंधी दिलेल्या माहितीनें व्यापला गेला आहे. या माहितींत अद्भुत शिवलीला, शैवविधींचा आश्चर्यकारक प्रभाव, शैवसाधूंच्या कथा व शेवटी विजयानगरचा नाश व पुढें येणारा लिंगायतपंथाच्या पुनःसंस्थापनेचा काळ यासंबंधी भविष्य ग्रथित केलें आहे.
याच काळांत (१५९५) कोल्हापूरच्या अदृशाचें ''प्रौढराय-चरित्रे'' पडतें. यांत वैष्णवपंथापेक्षां लिंगायतपंथ श्रेष्ठ आहे अशी प्रौढदेवरायाची खात्री करून देण्याकरितां अनेक कथा सांगितल्या आहेत. याखेरीज सोळाव्या शतकांत सिद्धलिंगयोगीनें केलेला ''राजेंद्रविजयपुराण'' नांवाचा चंपूग्रंथ येतो. यांत राजपुत्र भैरवेश्वर याचें वर्णन आहे.
लिंगायतयुगांतील जैनग्रंथकार - (११६० ते १६००) इकडे लिंगायत ग्रंथ भराभर बाहेर पडत असतां, जैनांमध्ये वाङ्मयीन चळवळीला ओहोटी लागली होती असें समजण्याचें मुळींच कारण नाहीं. वस्तुतः त्यावेळीं या वाड्मयाचे दोन ओघ बरोबरीनें वहत होते.
पुष्कळशा जैन ग्रंथांना पुराणें म्हणतात व त्यावर कोणत्यातरी तीर्थकराचें नांव असतें. अशा तर्हेचे चंपुपद्धतींत एक किंवा बरेचसे ग्रंथ लिहिल्याखेरीज कोणतेंहि वर्षदशक सुनें गेलें नाही, हें खालील यादीवरून दिसेलचः-
| सन | ग्रंथकार | ग्रंथाचें नांव |
| ११७० | नेमिचंद्र | नेमिनाथ |
| ११८९ | अग्गळ | चंद्रप्रभ (चंद्रप्रभु) |
| ११९५ | असन्न | वर्धमान |
| १२०० | बंधुवर्म | हरिवंशाभ्युदय |
| १२०५ | पार्श्वपंडित | पार्श्वनाथ |
| १२३० | जन्न | अनंतनाथ |
| १२३५ | गुणवर्म२रा | पुष्पदंत |
| १२३५ | कमलभव | शांतीश्वर |
| १२५४ | महाबलकवि | नेमिनाथ |
नेमिचंद्र हा कानडी भाषेंतील आद्य कादंबरीकार होय. यानें ''लीलावती'' ही कादंबरी चंपूपद्धतींत लिहिलेली असून तिची रचना फारच रमणीय आहे. हींतील कथा अशी आहे की एका कदंब राजपुत्राने स्वप्नांत एक सुंदर राजकन्या (नायिका) पाहिली व तिलाहि याचप्रमाणें त्याचें स्वप्न पडलें. त्यांची एकमेकांची मुळींच ओळख नव्हती. पण पुढें दोघांनींहि बराच शोध व साहसें केल्यानंतर त्यांची गांठ पडून लग्न लागलें. यांत शृंगाररसहि बराच आहे. नेमिचंद्राचा लक्ष्मणराज व वीरबल्लाळ या बल्लाळ राजांच्या दरबारी श्रेष्ठ दर्जा होता. वरिबल्लाळाच्या दिवाणाच्याच सूचनेवरून त्यानें ''नेमिनाथपुराण'' लिहिलें.
बंधुवर्म वैश्य जातीचा होता. ''हरिवंशाभ्युदया'' खेरीज यानें नीतिवैराग्यपर एक सुंदर ग्रंथ प्रसिद्ध केला. तो कोणा एका जीवन नांवाच्या व्यक्तीला संबोधून लिहिला असल्यानें त्याचे नांव ''जीवसंबोधन'' असें आहे.
जन्नाच्या अंगी बरेच गुण होते. तो बल्लाळ राजांच्या दरबारी राजकवि व सेनापतीहि होता. देवळें बांधणारा व त्यांची शोभा वाढविणारा अशीही त्याची कीर्ति आहे. ''अनंतनाथ'' पुराणाखेरीज त्यानें बरींच ''छंदोबद्ध शासनें'' लिहिलीं. वीरबल्लाळाच्या कारकीर्दीत लिहिलेलें ''यशोधर चरित्र'' (१२०९) हें काल्पनिक की ऐतिहासिक याचा उलगडा पडत नाही. यांत मारिअम्माला दोन मुलें बळी देण्यांत येत असतां, त्यांचा वृत्तांत ऐकून राजाला दया आली व त्यांने त्यांना सोडून दिलें व तप आचरिलें अशी कथा आहे. याची शैली मोहक व भारदस्त आहे. पार्श्वपंडित व गुणवर्म (२ रा) हे सौंदत्ति राजांच्या दरबारी असत.
याखेरीज खालील ग्रंथकारहि निर्देश करण्यायोग्य आहेत. यांचे सन अजमासानें दिलेले आहेत.
शिशुमायण : - (१२३२) हा 'सांगत्य' पदबंधांत लिहिणारा पहिला कवि होय. वाद्याबरोबर म्हणण्यासाठीं म्हणून सांगत्याची विशेष योजना केलेली असते. याने ''अंजनाचरित्रे'' व ''त्रिपुरदहन सांगत्य'' नांवाचें एक रूपकात्मक काव्य लिहिलें आहे.
आण्डय्य : - (१२३५) हा ''कब्बिगरकाव'' (कवींचा रक्षक) नांवाच्या चंपुग्रंथाचा कर्ता होय. या ग्रंथाला ''सोबगिन सुग्गि'' (सौंदर्याचें पीक), ''मदन-विजय'' व ''कावन-गेल्ल'' (काम-विजय) अशींहि दुसरीं नांवे आहेत. या ग्रंथांतील विशेष मजा म्हणजे यांत पहिल्यापासून शेवटपर्यंत एकहि अपरिचित तत्सम (संस्कृत) शब्द नसून, यांतील शब्दकोशांत सर्व तद्भव (संस्कृतापासून बनलेले) व देश्य शब्द आहेत. या बाबतीत याच्या जोडीचा एकहि दुसरा कानडी ग्रंथ नाही. ग्रंथाचा विषय मदनविजय आहे. चंद्रांला बद्ध केल्यामुळें शिवावर रागावून मदनानें त्याच्यावर बाणांचा मारा केला. तेव्हां शिवानें त्याला पत्नीवियोगाचा शाप दिला. पण त्यानें आपणाला शापमुक्त करून घेतलें व पुन्हा प्रियेशीं संयुक्त झाला. अशी कथा यांत आहे.
मल्लिकार्जुन :- (१२४५) ''शब्दमणिदर्पणाचा'' कर्ता जो केशिराज, त्याचा हा पिता होय. हा वीर सोमेश्वर (१२३४-१२५४) या होयसल राजाच्या वेळीं होता. यानें ''सूक्तिसुधार्णव'' किंवा ''काव्य-सार'' नांवाच्या ग्रंथांत त्याच्या पूर्वी झालेल्या सर्व कवींच्या कवितांचा समुद्र, पर्वत, नगर, ॠतु, चंद्रप्रकाश, संध्या, मैत्री, प्रणय, युद्ध वगैरे १८ विषयांखाली मोठा उपयुक्त संग्रह करून ठेवला आहे. याच्यानंतर १६०० च्या सुमारास अभिनववादिविद्यानंदानें दुसरा काव्यसार ग्रंथ रचिला.
केशिराजः- (१२६०) हा मोठ्या वाङ्मय व्यवसायी कुळांत जन्मला. याचा पिता काव्यसारकर्ता मल्लिकार्जुन, आजोबा (आईचा बाप) शंकर किंवा सुमतोबाण नांवाचा एक कवि (याची कृति हयात नाहीं) व चुलता (किंवा मामा ?) प्रख्यात ग्रंथकार जन्न होय. यानें ''शब्द णिदर्पण'' नांवाचा प्रख्यात व प्रमाणभूत व्याकरणग्रंथ लिहिला आहे.
कुमुदेंदुः (१२७५) यानें षट्पदी छंदांत एक रामायण लिहिलें आहे. त्याचें नांव ''कुमुदेन्दु रामायण.'' हें जैन कथेला अनुसरून लिहिलें असल्यानें ''पंपरामायणा''शीं याची तुलना करतां येण्यासारखी आहे. पण हा ग्रंथ अद्याप समग्र उपलब्ध नाहीं.
रट्टकविः- (१३००) हा एका जैन ग्रामाचा इनामदार होता. याचीं बरींच नांवे आहेत. यानें ''रट्टमत'' किंवा रट्टसुत्र या नांवाचा एक शास्त्रीय तर्हेचा ग्रंथ केला आहे. त्यांत पाऊस, भूकंप, विजा, ग्रह वगैरे नैसर्गिक दृश्यांवर विवेचन आहे. हा ग्रंथ चौदाव्या शतकांत भास्कर नांवाच्या तेलगू कवीनें तेलगूंत भाषांतर करून घेतला आहे.
नागराज (१३३१) - यानें आपल्या ''पुण्याश्रवा''त गृहस्थधर्माच्या उदाहरणादाखल पौराणिक पुरूषांच्या ५२ कथा लिहिल्या आहेत.
मंगराज १ ला (१३६०) यानें वैद्यकीवर ''खग्रेंद्र मणि दर्पण'' नांवाचा ग्रंथ केला असून त्यांत पांचव्या शतकांतील पूज्यपादाचा वैद्यकावरील ग्रंथ आधारादाखल घेतला आहे.
मधुरः- (१३८५) विजयानगरच्या हरिहराच्या दरबारी कवि होता. याला राजाच्या मंल्याचा चांगला आश्रय असे. यानें ''धर्मनाथ'' (१५ वा तीर्थकार) पुराण व श्रवणबेळगोळच्या गोम्मतेश्वरावर एक प्रशंसापर ग्रंथ लिहिला. चौदाव्या शतकातील असतांहि यानें प्राचीन जैन कवींच्या लेखनाची प्रौढ शैली बरोबर उचलली होती.
अभिनवचंद्र :- (१४००) यानें ''अश्ववैद्य'' नांवाचा ग्रंथ लिहिला आहे. यानें पूर्वी झालेले अश्वावरील ग्रंथ विशेषतः चंद्रराज (११७०) याचा ग्रंथ आधारभूत घेतला आहे. तरी त्याच्या काळापर्यंतची माहिती त्यांत गोंविली आहे.
पहिलेवैष्णव ग्रंथ - वैष्णव कानडी वाङ्मयात इतर ग्रंथाच्या मानानें पहातां नवीन असें फार थोडेंच आहे. यात बरीचशीं पुस्तके निरनिराळ्या प्रकारांनी संस्कृतावरून तयार केलेली आहेत. वस्तुतः कानडींत लिहिणारा पहिला वैष्णव ग्रंथकार म्हणजे वीर बल्लाळच्या कारकीर्दीत (११७२-१२१९) झालेला रुद्रभट्ट नांवाचा स्मार्त ब्राह्मण होय. याच्या ''जगन्नाथ विजय'' ग्रंथांत विष्णुपुराणांतील कृष्णजन्मापासून बाणासुरयुद्धापर्यंत इतिहास दिला आहे. हा जैन कवींच्या धर्तीवर चंपुवृत्तांत लिहिलेला ग्रंथ आहे व बराच लोकप्रियहि आहे. यापुढें एक शतकानंतर (अजमासें १३००), चावुंडरस नांवाच्या पंढरीच्या विठोबाचा भक्त असलेल्या एका ब्राह्मणानें ''अभिनव-दश-कुमार-चरित्र'' या दंडीच्या संस्कृत ग्रंथाचें कानडींत चंपुपद्धतींत रूपांतर केले.
संस्कृत ग्रंथांची भाषांतरे - कानडी वाङ्मयात वैष्णव धर्माचा उदय इ.स. १५०० पासून दिसून येतो. याला सुरुवात ''महाभारताच्या'' कानडी रूपांतरापासून झालेली दिसते. विजयानगरच्या कृष्णरायाचा (१५०८-१५३०) या कामाला मोठा आश्रय होता. याचीं पहिली १० पर्वे, धारवाड जिल्ह्यांतील कोडिवाल गांवच्या नारणप्पा नांवाच्या गौड ब्राह्मणानें तयार केलीं. हा ग्रंथकार ''कुमार व्यास'' या टोपण नांवानें ओळखिला जातो. यानें आपली कृति गदग-ग्रामदेवतेला अर्पण केली असल्यानें या भागाला कधीं कधीं ''गदगिन भारत'' असेंहि म्हणण्यांत येतें. राहिलेल्या पर्वांचें तिम्मण्णानें भाषांतर करून त्याला ''कृष्णराय भारत'' असें आपल्या आश्रयदात्या राजाचें नांव दिलें. हे दोनहि भाग षट्पदी छंदांत लिहिले आहेत. या भारतप्रकाशनाच्या कामाला यश आलेलें पाहून, ब्राह्मणी पद्धतीचे कानडी ''रामायण'' तयार करण्याचें काम हाती घेण्यांत आलें. पण मध्यंतरी विजयानगरची गादी उध्वस्त केली गेल्यामुळें (१५६५) सोलापुर जिल्ह्यांतील तोरवे गांवी हें काम पार पाडण्यांत आलें. म्हणून याला बहुधा ''तोरवे रामायण'' असें म्हणण्यांत येतें. हाहि ग्रंथ षट्पदीत आहे. याच्या लेखकाचें खरें नांव माहीत नाही; पण त्याचें टोपण नांव मात्र ''कुमार वाल्मीकी'' असें आहे. इ.स.१५९० च्या सुमारास हा ग्रंथ लिहिला गेला असावा.
आणखी दोन भारताचे ग्रंथ या प्रांतांत झाले, पण त्यांचा फारसा प्रसार झाला नाही. एक लक्ष्मकवीनें केलेलें ''लक्ष्मकवी भारत'' व दुसरें शाल्व नांवाच्या जैन कवीनें लिहिलेलें ''शाल्व-भारत.'' शाल्व, कोंकणात नगर-नगरी येथें राज्य करीत असलेल्या शाल्वमल्ल-नरेंद्र नांवाच्या राजाच्या पदरी होता. यानें जैन परंपरेला धरून आपलें भारत तयार केले आहे. सतराव्या शतकातलें सुकुमार भारतीनें केलेलें आणखी एक भारत आढळतें.
''तोरवे रामायण'' नंतर लवकरच षट्पदी वृत्तांत ''भागवत पुराण'' झालें. त्याच्या कर्त्याने आपलें नांव चाटु विठ्ठलनाथ असें दिलें आहे. त्याला नित्यात्मशुल्क असेंहि नांव आहे. भागवताच्या दहाव्या स्कंदात कृष्णकथा असून, तोच भाग जास्त वाचण्यांत येतो. कानडी भागवत पुराणाच्या वेळेसच या दशम स्कंदाचें ''कृष्णलीलाभ्युदय'' नांवाचे स्वतंत्र कानडी पुस्तक तयार झालें. याचा कर्ता वेंकय आर्य नांवाचा माध्व ब्राह्मण होता. त्यानें हा ग्रंथ तिरूपतीच्या वेंकटसोरिसंज्ञक कृष्णमूर्तीला अर्पण केला आहे.
रामायणकथांमध्यें, तिम्मार्याचें ''आनन्द रामायण,'' तिप्पनार्याचा ''हनुमद-विलास'' आणि तिरुमल वैद्यांचें ''उत्तर रामायण'' या ग्रंथांचा निर्देश केला पाहिजे. तिम्मार्य आनेकलजवळील सादलि गांवचा होता. याच्या विषयीं अशी आख्यायिका आहे कीं, जरी तो शिकलेला पंडित नव्हता, तरी वयाच्या १५ व्या वर्षापासून त्याचा नैसर्गिक काव्यस्फूर्तीचा गुण दृग्गोचर होऊं लागला; रोज सकाळी स्नान केल्यानंतर तो आपल्या तिम्मराय स्वामिदेवापुढें स्वतः पदें करून म्हणत असे व त्याचा एक नातलग ती उतरून घेई. ही पदें षट्पदी छंदांत असत.
लौकिकभक्तिपरपदें - वैष्णवदास किंवा गांवोंगावीं हिंडणारे गवई भिकारी ''रगळे'' (भावनाकाव्य) वृत्तांतजीं लहान लहान पदें म्हणत त्या योगाने कृष्णभक्ति लोकांत बरीच फैलावली. यांनां मध्वाचार्य व चैतन्य यांच्याकडून ही कृष्णगानाची स्फूर्ति मिळाली. इ.स. १५१० च्या सुमारास चैतन्य दक्षिण हिंदुस्थानभर हिंडून त्यानें सर्वत्र लोकांनां हरिनाम घेण्याविषयीं उपदेश केला. या कानडींतील भक्तिपर पद्यांपैकी ४०२ गद्यांचा रे. डॉ. मोएग्लिंगनें संग्रह करून, त्यांतील १७४ मंगळूर येथें इ.स. १८५३त छापिलीं. हीं ''दासर पदगळु'' या नांवाने प्रसिद्ध आहेत. या गवईभक्तांपैकी अगदी जुना, अतिशय प्रख्यात व जबर लेखक म्हणजे पुरंदरदास; याचे वास्तव्य पंढरपूर येथें व अच्युतरायाच्या कारकीर्दीत विजयानगर येथें असे. हा १५६४ त म्हणजे तालिकोटच्या लढाईच्या आधीं एक वर्ष वारला. याचा समकालीन कनकदास बेड (व्याध) जातीचा असून, कागिनेले (चितलदुर्ग किंवा धारवाड) गांवचा रहाणारा असे. यानें प्रासंगिक पदांखेरीज, ''मोहन तरंगिणी'' (आणि त्यांत कृष्णाविषयीं पौराणिक कथा), ''नलचरित्रे'' (षट्पदी छंदांत), ''कृष्णचरित्रे'' आणि ''विष्णुभक्तिसार'' हे ग्रंथ लिहिले. इतर गवयांचीं नांवे म्हणजे, विठ्ठलदास, वेंकटदास, विजयदास आणि कृष्णदास. यांपैकी शेवटले तीघे उडुपीचे रहाणारे होते. या गवयांच्या पंक्तीला वराह तिम्मप्प दास यालाहि बसविलें पाहिजे. जबर लेखनाच्या बाबतींत याचा नंबर पुरंदरदास व कनकदास यांच्या खालीं लागेल. पण हा त्यांचा समकालीन नसून दोन शतकें पुढें हैदर अल्लीच्या वेळीं होऊन गेला. सागर हैदर अल्लीच्या हातांत पडल्यावर तो तिरुपतीला पळाला. उडुपीचा मध्वदास याचा समकालीन होय.
या सर्व पद्यांचा हेतु, सर्व देवांपेक्षां विष्णुला श्रेष्ठपणा देऊन लोकांनां त्याची उपासना करण्यास वळवावयाचें. या पद्यांपैकी एकाचा निष्कर्ष असा आहे कीं:- विष्णुतुल्य दुसरा देव नाहीं; शाळिग्रामतुल्य दुसरें तीर्थ नाही; भारततुल्य दुसरा ग्रंथ नाहीं; वायुतुल्य दुसरे चैतन्य नाही; मध्वशिक्षेसारखी दुसरी शिक्षा नाही; ब्राह्मण जातीसारखी दुसरी जात नाही.'' कृष्णलीला वर्णन करून, तीर्थयात्रा करण्याचा उपदेश या पद्यांतून केलेला असतो. हें जग कंटाळवाणें आहे, आपण निराश्रित व पापी आहोंत, बाह्य संस्कारांना काही किंमत नाहीं. आपण अन्तर्बाह्य शुद्ध झालें पाहिजे, आपणाला दैवी मदतीची जरूरी आहे, अशा प्रकारची लोकांत जागृति करून देऊनच सन्निध असणार्या मृत्यूची व नरकयातनांची त्यांनां आठवण देऊन आयुष्य धर्माप्रमाणें कंठण्याचा लोकांना हीं पदे सदुपदेश करितात.
कृष्णोपासनेची लोकांत आवड उत्पन्न करणारा दुसरा ग्रंथ म्हणजे, अठराव्या शतकांत चिदानंदानें रचिलेला ''हरिभक्तिरसायन'' होय. शैव (वीर-शैव नव्हे) भक्तिरसायण म्हणून १७ व्या शतकांत सहजानंदानें षट्पदी छंदांत रचिलेला दुसरा एक असाच ग्रंथ आहे.
सतराव्या व अठराव्या शतकांतील कानडी वाड्मय-सतराव्या शतकांत व अठराव्या शतकाच्या आरंभी, विशेष नामनिर्देश करण्यासारखे असे तीन लेखक होऊन गेले व त्यांपैकी प्रत्येकानें आपआपल्या शाखेंत कांहीं उत्कृष्ट असें वाङ्मय निर्माण केलें आहे. हे तिघे तीन मुख्य पंथातले होते. एक जैन, तर दुसरा लिंगायत व तिसरा वैष्णव ब्राह्मण होता. यांपैकी कोणालाहि राजाश्रय नव्हता.
भट्टाकलंक देवः- हा दक्षिण कर्नाटकांतील हाडुवल्लि मठाच्या जैन गुरूचा शिष्य होता. तो संस्कृत व कानडी या दोनहि भाषांचा चांगला पंडित होता. १६०४ मध्यें त्यानें आपला मोठा कानडी व्याकरणाचा ग्रंथ ५९२ संस्कृत सूत्रांत पुरा केला; त्याला संस्कृतांतच वृत्ति व व्याख्या जोडली आहे. मूळ सूत्रांचीं पानें थोडीं भरतील पण त्यांची टीका त्यांच्या पन्नास पट मोठी होईल. या ग्रंथांचें नांव ''कर्णाटक शब्दानुशासनम'' असें आहे. प्रमुख कानडी लेखकांचे उतारे व मागील काळांतील अनेक प्रमाणभूत विद्वानांचे उल्लेख यांत देऊन ग्रंथाचें महत्व वाढविलें आहे. ही भाषा विद्वानांच्या नजरेस आणावी, तिला सुसंस्कृत करावी, उपयोग करतांना तिचें याथार्थ्य व सौष्ठा वृद्धिंगत व्हावें, ती संस्कृतप्रमाणें अभ्यासली जावी या हेतूने भट्टाकलंक देवानें परिश्रम केले आहेत. जरी ग्रंथ संस्कृतांत आहे तरी कोणत्याहि कानडी वाङ्मयाच्या इतिहासांत त्याला स्थान मिळण्याइतक्या योग्यतेचा तो आहे यांत संशय नाहीं.
पडक्षर देव - हा येलंदूरचा लिंगायत असून, एका येलंटूर जवळच्या एका मठाचा अधिपति होता. त्यानें संस्कृतांत व कानडींत पद्यरचना केलेली आहे. कानडींत त्याचे तीन ग्रंथ आहेत, ते ''राजशेखरविलास'' (१६५७), ''वृषभेंद्रविजय'' (१६७१), आणि ''शबरशंकरविलास'' हे होत. यांपैकी पहिल्या ग्रंथावरून त्याचा लौकिक झाला. ''जैमिनिभारता'' नंतरचें या भाषेंतलें अतिविख्यात काव्य हेंच आहे. अत्युत्तम काळच्या चंपुपद्धतींत हें लिहिलेलें आहे. ही एक नमुनेदार पद्यकादंबरी असून यांतील वर्णनाची शैली बहारीची आहे. या कथेची रूपरेषा येणेंप्रमाणेः-
कथानायक राजशेखर धर्मावतीच्या गादीवर असलेल्या सत्येंद्र चोलाचा पुत्र होता, त्याच्याच बरोबर वाढलेल्या मितवचन नांवाच्या प्रधानपुत्राशीं त्याचा अत्यंत स्नेह असे. त्या दोघांनीं लंकेवर स्वारी केली व तेथें राजशेखरानें राजाच्या मुलींशी लग्न लाविलें. राजधानीस परत आल्यावर कांही दिवसांनी सिंधुराजाकडून राजशेखरला दोन पाणीदार घोडे नजराणा म्हणून आले. तेव्हां त्यानें या गजबजलेल्या शहरांतून घोड्यावरून रपेट करूंया अशी आपल्या मित्रापाशी गोष्ट काढली. 'एखाद्या प्राणहानीबद्दल देहांत शिक्षा सांगितली आहे व गुन्हेगाराचा दर्जा कितीहि उच्च असला तरी आपण कायद्याची अंमलबजावणी निःपक्षपातानें करूं अशी तुझ्या पित्याची प्रतिज्ञा आहे.' अशाप्रकारें राजपुत्रांला आठवण देऊन त्याचें मन वळविण्याचा मितवचनानें बराच प्रयत्न केला. या गोष्टीचे सर्व परिणाम मी स्वतः भोगीन असे राजशेखरानें उत्तर देऊन, मितवचनासह तो घोड्यावर बसून निघाला. मितवचनाला आपला घोडा न आवरल्यामुळें तो एका मुलाच्या अंगावर जाऊन त्याची हत्या झाली. मृत मुलाच्या आईनें राजाकडे फिर्याद नेली तेव्हां मीच खरा दोषी आहे असें राजशेखरनें कबूल केलें; व त्याला देहांत शिक्षा झाली. तेव्हां शोकानें मितवचनाने स्वतःलां मारून घेतलें व हें पाहून त्याच्या मातापिरांनीं आत्महत्या केली. राजशेखराची माता व पत्नी तसेंच करण्याच्या बेतांत होत्या. इतक्यांत शिवानें आड येऊन सर्वांना उठविलें व सत्येंद्रचोलाची त्याच्या अढळ स्थैर्याबद्दल स्तुति करून त्याला स्वर्गांतील सुखें अनुभविण्यास बरोबर नेले.
लक्ष्मीशः - हा अर्सीकेरे तालुक्यातील देवनूर गांवचा वैष्णव ब्राह्मण होता. हा प्रख्यात ''जैमिनि भारता''चा कर्ता होय. याच्याविषयीं फार थोडी माहिती सांपडते. तसेंच याचा कालहि अद्याप निश्चित नाहीं. अठराव्या शतकाच्या आरंभीं याला घालण्यांत येतें. याचें काव्य सबंध षट्पदींत लिहिलें असून त्या छंदांतील हें उत्तम उदाहरण म्हणून देतां येईल. कथा सांगणारा जैमिनि मुनि आहे म्हणून या काव्याचें ''जैमिनिभारत'' हें नांव ठेविलें आहे. युधिष्ठिराच्या अश्वमेधीय अश्वाचा संचार यांत वर्णिला आहे. महाभारतांतल्या अश्वमेधपर्वाशीं याचें साम्य आहे (जैमिनि अश्वमेध व कानडी-जैमिनि भारत यांतील कथा एकच आहेत व अनुक्रमहि तोच दिसतो, तेव्हां संस्कृत जैमिनि अश्वमेधाचें हें कानडी रूपांतर असावें). या काव्याचा गोषवारा असाः-
कौरवांना जिंकल्यावर युधिष्ठिर अश्वमेध करण्याचा बेत करतो. भद्रावतीहून भीमानें अश्वमेधास योग्य अश्व आणिल्यावर तो द्वारकेहून कृष्णाला हस्तिनापुरीं घेऊन येतो. नंतर घोडा मोकळा सोडून कृष्णार्जुन ससैन्य त्याच्या रक्षणार्थ मागें राहतात. माहिष्मती, चंपकापुर, स्त्रीराज्य (पांडय व मलयाळम् देश), राक्षसप्रदेश, मणीपुर, रत्नपुर, सारस्वरत आणि कुंतल या ठिकाणीं जाऊन घोडा परत जिंकलेल्या राजांसह हस्तिनापुरीं येतो.
या काव्याची गोडी मुख्यतः त्यांतील उपाख्यानांत असून त्यांतील निवडक उपाख्यानें चार आहेत ती (१) सुधन्व्यांची कथा (२) बभ्रूवाहनाची कथा (३) मयूरध्वजाची कथा व (४) चंद्रहासकथा.
म्हैसूरच्या राजदरबारचें वाङ्मय :- १७व्या व १८व्या शतकांतील कानडी वाङ्मयाचे पोशिंदे मुख्यतः म्हैसूरचे राजे असत. ते अजमासें १६१० पासून स्वतंत्र झाले होते. या म्हैसूर शाहींतील बरीचशीं पुस्तकें ''इतिहास'' शाखेंतलीं आहेत. आतांपर्यतचा म्हैसूरशाहीचा इतिहास खोदीव लेखांतून पहावा लागे; पण यापुढें ग्रंथरूपांत तो दिसू लागत चालला. या ग्रंथांपैकी कांही खालील होत; नंज कवीचें ''कंठीरव नरसराजचरित्र'' गोविंद वैद्याचा ''कंठीरव नरसराजविजय'' हे दोन्ही ग्रंथ या राजाच्या कारकीर्दीसंबंधाचे (१६३८-५९) आहेत; ''देवराजविजय'' हा चन्नार्य यानें दोड्ड देवराज (१६५९-७२) याच्या कारकीर्दीचा लिहिलेला छंदोबद्ध इतिहास होय. ''चिक्कदेवराज यशोभूषण'' आणि ''चिक्कदेवराज वंशावळि'' (१६७२-१७०४) यांचा कर्ता तिरुमलयेंगार; आणि पुट्टया याचा ''मैसूर अरसुगळ पूर्वाभ्युदय'' (१८१३). १७९६ मध्यें टिपूनें घोड्यांचे चणे शिजविण्यासाठी जुन्या कानडी ग्रंथांचा उपयोग करण्याचा जो हुकूम सोडला होता त्या संकटांतून हा शेवटचा ग्रंथ निभावलेला आहे. म्हैसूरचा इतिहास लिहिण्याच्या कामीं विल्कसनें याला प्रमाणभूत मानिलें आहे. याच ठिकाणीं वीरराजेंद्र (१८०८) यानें ''राजेंद्रनामे'' नांवाचा कुर्ग राजांचा लिहिलेला इतिहास उल्लेखणें उचित आहे.
कानडी वाङ्मयासंबंधात चिक्कदेव रायाच्या कारकीर्दीचा (१६७२-१७०४) विशेष नामनिर्देश करणें अवश्य आहे. त्याच्या आयुष्याचा पूर्वभाग येलंदुर येथें गेला. ''राजशेखर'' लिहिला गेला त्यावेळीं तो त्या ठिकाणी असावा. तेथें विशालाक्ष नांवाच्या जैन पंडिताशीं त्याचा दाट स्नेह जमला. तो इतका कीं, चिक्कदेव १३ वर्षे (१६५९-७२) आपल्या चुलत्याच्या बंदिशाळेंत असतां विशालाक्ष त्याच्या जोडीला असे. या गोष्टीमुळें चिक्कदेव वाङ्मयभोक्ता होऊन त्याला आश्रय देण्यास प्रवृत्त झाला असेल. त्यानें ऐतिहासिक साधनांचा मोठा मौल्यवान संग्रह करून ठेवला होता. दुर्दैवानें यांपैकी बहुतेकांचा टिपूनें नाश करून टाकिला आहे. चिक्क देवानें स्वतः तीन ग्रंथ केलेले आहेत ते ''शेषधर्म'' ''चिक्कदेव राज बिन्नपम'' आणि ''चिक्कदेवराज षट्पदि बिन्नपम'' शेवटचा तीस पद्यांचा धर्मपर ग्रंथ असून त्यांत नारायणाचें स्तवन आढळतें. त्याचा दुसरा दिवाण जो तिरुमलयेंगार यानें वर सांगितलेल्या दोन इतिहासांखेरीज ''शेष कलानिधि'' (चंपु), ''गीत गोपाळ'' आणि ''अप्रतिम वीरचरित्र'' नांवाचा साहित्यशास्त्रावरील ग्रंथ असे ग्रंथ लिहिले. चिकुपाध्याय (याला अलसिंगार्य असेंहि म्हणत) नांवाच्या आणखी एका दिवाणाने चंपु, सांगत्य व गद्यांत तीस ग्रंथ केले. ''विष्णुपुराण'', ''रुक्मांगदचरित्र'' आणि ''दिव्यसूरि-चरित्र'' हे चंपुग्रंथांत येतात. गद्य ग्रंथांत ''विष्णुपुराणा''ची दुसरी एक प्रत, ''शुकसप्तति'' आणि ''यदुगिरी माहात्म्य'' यांसारखे ग्रंथ आहेत. विशिष्टाद्वैताचें प्रतिपादन करणारा ''सात्विक ब्रह्मविद्याविलास'' याचाच आहे.
चिक्कदेवरायाच्या दरबाराचे दुसरे लेखक म्हणजे, तिरुमलार्याचा भाऊ व ''मित्रविंद गोविंद'' या नाटकाचा कर्ता सिंगरार्य; आणि चिकुपाध्यायायाची शिष्यीण व राणीची दासी असलेली कवियित्री होन्नम्मा हे होत. होन्नम्मानें पतिव्रताधर्मावर 'हदिबदेयधर्म' ''नांवाचें एक सांगत्य लिहिलें आहे.
लिंगायत, जैन आणि ब्राह्मणी पंथांचे ग्रंथ - मध्यंतरी लिंगायत, जैन व ब्राह्मण या निरनिराळ्या धार्मिक पंथांची मतें प्रतिपादणारे ग्रंथ एका पाठोपाठ तयार होत होते.
सतराव्या शतकाच्या मध्यांत, निजगुणयोगी नांवाचा एक विद्वान् लिंगायत लेखक होऊन गेला. ''विवेक चिंतामणी'' (चंपु) - शैवविद्येचा एक प्रकारचा ज्ञानकोश; ''कैवल्यपद्धति''- तात्विक विषयांवरील रगळे पद्यें, पुरातन त्रिपदि-६३ पुरातनांची (शैव साधूंची) त्रिपदि छंदांत माहिती; ''परमार्थ गीता'' आणि ''परमानु बोधे'' हे तीन वेदांत शिक्षेचे ग्रंथ हे निजगुणयोगींनें केलेल्या ग्रंथांपैकीं होत. ''ब्रह्मोत्तर खंड'' ''शिवकथमृतसार'' हा कोणी अज्ञात कवीनें षट्पदि छंदात केलेला ग्रंथ याच काळांतील आहे. १६८० च्या सुमारास जेव्हा चिक्कदेवरायानें जंगम धर्मोपदेशकांची कत्तल करून लिंगायत मठ उध्वस्त केले, तेव्हां लिंगायत संप्रदायाचें बरेंच नुकसान झालें. व यापुढें थोडेच लिंगायत ग्रंथकार झालेले दिसून येतात. १७६० च्या सुमारास दळवायि (म्हैसूर संस्थानचे परंपरागत सेनापति) घराण्यांतील नंजराजानें ''शिवभक्तिमहात्म्य'', ''हरिवंश'', ''लिंगपुराण'' हे ग्रंथ लिहिले. याच काळातील सर्वज्ञमूर्ति यानें ''सर्वज्ञ पदगळु'' हें त्रिपदि छंदांतले काव्य रचलें. यात बरीच सुभाषितें असून ती लोकांच्या नेहमी तोंडी आहेत. त्यांची कित्येक सामाजिक, धार्मिक व नैतिक पद्यें चांगली प्रचलित आहेत. मराठी वाङ्मयांत तुकारामाचा जो दर्जा, तोच कानडीत सर्वज्ञाचा आहे.
जैन संप्रदायाचे या दोन शतकातील कांही ग्रंथ येणेप्रमाणें:-
''जिनमुनितनय'' कर्ता नूतनागचंद्र, ''जिनभारत'' कर्ता ब्रह्मकवि; ''जिनस्तोत्रसंग्रह'' आणि ''तीर्थंकरपुराण'' (गद्य), ''पद्मावती देवी कथे'' (रगळे) १७६१ मध्यें सुराल यानें पश्चिमकिनार्यावरील एका राजकन्येकरितां हे रचिले; १८०० ते देवचंद्र यानें म्हैसूर राजघराण्यांतील एका राजकन्येकरितां जैन इतिहास व कथा यांचे सार ''राजावळि कथे'' (गद्य) या ग्रंथांत काढिलें; यानें पंप रामायणाच्या आधारें ''रामकथावतार'' (गद्य) रचिलें.
ब्राह्मणी सांप्रदायिक ग्रंथांत प्रसिद्ध असे ग्रंथ दोन. ते १७ व्या शतकांतील महालिंग रंग याचा ''अनुभवामृत'' (षट्पदी) आणि १८ व्या शतकात चिदानंद अवधूत यानें केलेला ''ज्ञान सिंधु'' हे होत. हे दोनहि वेदांवरील ग्रंथ आहेत.
लहान गोष्टींचे संग्रह - या काळांत वाङ्मयाची दुसरी महत्वाची जी शाखा उदयास आली ती नवलकथांची. विशेषतः लहान कथांच्या संग्रहरूपांत असणार्या नवलकथांची-होय. हे संग्रह बरेचसे गद्यांत असून त्यांचे वाचकहि बरेच आहेत. त्यांचीं मुळें संस्कृतांत आहेत व कोणत्या तरी रूपांत ते सर्व हिंदुस्थानच्या माहितीचे आहेत. या प्रकारच्या कानडी ग्रंथांपैकी नामनिर्देश करण्यालायक म्हणजे खालील होतः-
''पंचतंत्र'':- याची चंपूवृत्तांतील प्रत ११४५ त दुर्गसिंहानें केलेली पूर्वी उल्लेखिलेली आहेत. कानडींत पंचतंत्राच्या अनेक गद्य प्रती असून त्यांतील गोष्टींचा अनुक्रमहि निराळा आहे.
''बत्तीस पुत्तळि कथे'' :-मराठींतील सिंहासनबत्तिशीप्रमाणें सिंहासनाच्या पायर्यांवरील ३२ पुतळ्यांनीं भोजराजाला सांगितलेल्या विक्रमादित्याविषयींच्या ३२ कथा.
''वेताळपंचविंशति कथे'' - हा ग्रंथ चंपु, त्रिपदि आणि गद्य या तीन स्वरूपांत आहे. त्यांत उज्जनीच्या विक्रमाला कांही सिद्धींच्या प्राप्तीसाठी रात्री अगदी मुकाट्यानें झाडावरून एक प्रेत नेण्याला कसें सांगितले ते दिलें आहे. विक्रम पंचवीस वेळां प्रयत्न करतो व प्रत्येक वेळीं एक वेताळ येऊन त्याला हाटकतो व कांही गोष्ट सांगून शेवटीं एक कोडे घालतो, विक्रमाचें चित्त आकर्षिलें जाऊन तो बोलावयास उद्युक्त होतो व रीतीनें आपला कार्यनाश करून घेतो.
''शुकसप्तति'' :- जिचा नवरा प्रवासाला गेला आहे अशा एका युवतीला एका शुकानें सांगितलेल्या सत्तर गोष्टी.
"कथामंजरि" व "कथासंग्रह" : - निरनिराळ्या ठिकाणच्या बोधप्रद गोष्टी
''तेन्नल रामकृष्ण कथे'' :- विजयानगरच्या कृष्णराजा (१५०८-३०) च्या वेळच्या आनेगुंदि येथील दरबारी नकल्याच्या हसवणार्या कथा यांत आहेत. यांतील एक पुढें दिली आहे.
कानडी विनोदाचा एक नमुना :- तेन्नाल रामकृष्ण व कुबडा मनुष्यः- नेहेमींच्या पेक्षां जास्त धिटाईनें एके दिवशीं तेन्नालरामकृष्णानें राजाची मस्करी केली त्यामुळें रागावून राजानें त्याला मारण्याचा निश्चय केला व ''गळ्यापावेतों जमीनींत पुरून हत्तीकडून त्याला तुडवा'' असा हुकूम सोडला. त्याप्रमाणें राजरक्षकांनी तेन्नालरामाला उघड्या मैदानांत नेलें व तेथें एक खड्डा खणून त्यांत त्याला घातले व डोक्यापावेतों वर माती लोटली. नंतर राजरक्षक राजाचा हत्ती घेऊन येण्यास निघून गेले. ते निघून गेल्यावर एक कुबडा त्या रस्त्यानें आला व जमीनीच्या वर माणसाचें फक्त डोकेंच दिसत असलेलें पाहून त्याला आश्चर्य वाटलें व तो सहाजिकच हें असें कसें घडलें म्हणून तेन्नालीरामाला विचारूं लागला. तेन्नालीरामानें उत्तर दिलें की, ''बरीच वर्षे मला कुबडानें फार त्रास दिला होता व त्यापायीं मी वैद्यांनां सर्वस्व दिलें पण कोणीहि मला बरा करीना, तेव्हा कोणी एकानें असा उपाय सुचविला की 'जर डोक्यापर्यंत जमीनींत पुरून घ्याल तर खात्रीनें तुमची पाठ आपोआप सरळ होईल. कधीं बरा होईन असे मला झाल्या कारणानें मी माझ्या मित्रांनां तसें मला पुरून टाकण्यास विनंति केली. मला आतां कोणी वर काढण्यास पाहिजे.'' हें ऐकून कुबड्यानें माती उकरून त्याला बाहेर काढलें. तेव्हां तेन्नालराम मोठा आनंद व्यक्त करून म्हणाला ''पहा माझें कुबड पार गेलें व मी आता चांगला सरळ झालों आहे अतां तूं आंत हो व आपलें कुबड बरें करून घे ''यावर तो मनुष्य आंत उतरला व तेन्नालरामानें वर माती लोटली, आणि तेथून निघून जाऊन लपून बसला. तेव्हां राजरक्षक हत्तींनां घेऊन परत आले तेव्हां दुसराच मनुष्य त्या ठिकाणीं पुरलेला पाहून त्यांना आश्चर्य वाटलें. त्या कुबड्याची हकीकत ऐकून त्यांनी ती राजाला सांगितली. तेव्हा राजाला त्या नकल्याच्या थट्टेचें व कल्पकतेचें इतके हंसू आलें कीं त्यांचा सर्व राग मावळला व त्यानें तेन्नालरामाला क्षमा करून त्याला परत नोकरीवर घेतलें.
अर्वाचीनयुग, १९ वें शतकः- १९ व्या शतकापासून हिंदुस्थानांतील ब्रिटिश राज्य, यूरोपीय संस्कृतीचा आघात आणि पाश्चात्य शास्त्रीय दृष्टीनें संशोधन व पांडित्य यांचा प्रवेश, यांच्या परिणामामुळें कानडी वाङ्मयांत एका अगदीं नवीन युगाला सुरूवात झाली. देशांतील शिक्षणाच्या पाश्चात्य पद्धतीवर झालेल्या मांडणीमुळें लोकांची वाचनाभिरुचि वाढली. त्याबरोबर स्ववाङ्मयाचें ज्ञान व आस्थाहि वाढली. हल्लींचे वाङ्मय बहुधा गद्यरूपातच असतें असें म्हणण्यास हरकत नाही.
सद्यःप्रयत्नांचेवर्ग :- या काळांतील सर्व ग्रंथ व ग्रंथकार न सांगतां फक्त त्यांच्या परिश्रमांची दिशा दाखविण्यासाठीं या काळांतील विशिष्ट प्रयत्नांचे वर्ग पाडून कांही थोडीं उदाहरणें पुढें दिलीं आहेत.
(अ) बरेचसे शैक्षणिक ग्रंथ निघालेले असून ते हळूहळू जास्त जास्त योग्यतेचे तयार होत असलेले दृष्टीस पडतात. त्यांत भाषा, इतिहास, गणित, शेतकी, आरोग्य, वैद्यक व इतर विषयांवर ग्रंथ आहेत. अशा रीतीनें शास्त्रीय वाङ्मयास सुरुवात झाली आहे. फलज्योतिष आणि शकुन यांवरील ग्रंथांनां अद्याप बरीच मागणी आहे. तथापि निश्चित शास्त्रांची वाढ झाल्यावर हे मागें पडतील असा भरंवसा आहे.
(आ) जुन्या ब्राह्मणी काव्यावर विद्यार्थ्यांच्या उपयोगासाठीं बर्याच टीका तयार झालेल्या आहेत. पण प्राचीन जैन साहित्यग्रंथावर (तो धर्म लोकांच्या मनांतून उतरल्यामुळें) टीका करण्याचें कोणाच्या मनांत आलें नाही.
(इ) ''यक्षगाना''च्या धर्तीवर लिहिलेल्या महाकाव्यांतील गोष्टींचा एक वर्ग पडतो. धंदेवाईक किंवा हौशी नटांनी गांवढळ श्रोतृवृंदांपुढे म्हणण्याला योग्य अशा नाटकी पद्धातीवर या गोष्टी लिहिलेल्या असून त्या फारच लोकप्रिय आहेत. शांतय्या नांवाच्या गिरसप्पा येथील एका ब्राह्मणानें अशा तर्हेची बरीच रचना केलेली आहे.
उच्च दर्जाचीं नाटकें हल्लीं तयार होऊं लागलीं आहेत. मागील शतकांत ही वाङ्मयशाखा बहुतेक दुर्लक्षिली गेली होती. या संबंधात पुढील नाटकांचा विशेष उल्लेख केला पाहिजे. ''तपतीपरिणय'' कर्ता चामराजनगर तालुक्यांत सरगूर येथें राहाणारा वेंकटवरदाचार्य; ''शकुंतला'' हे चामराजेंद्र वोडेयर (१८६८-१६९४)चा दरबारी कवि बसवप्पाशास्त्री यानें संस्कृतावरून तयार केलें.
(ई) कादंबर्या जास्त लोकप्रिय होत चालल्या आहेत. आतांपर्यत प्रसिद्ध झालेल्या कादंबर्यांपैकीं बहुतेक इंग्रजी व बंगाली कादंबर्यांची रूपांतरें आहेत. शेक्सपियरच्या बर्याचशा नाट्यकथा यांत आहेत, उदा. ''भ्रांतिविलास'', ''जयसिंहराज चरित्रे'', ''पंचाल परिणय'' इत्यादि. बाबू बंकिमचंद्र चट्टोपाध्याय व सुरेंद्रनाथ यांच्या कादंबर्यांची रूपांतरे विशेषतः रा.बी.व्यंकटाचार्य यांनीं केलेलीं आहेत. यांपैकी प्रसिद्ध म्हणजे ''दुर्गेशनंदिनी'' होय.
(उ) दैनिक किंवा साप्ताहिक वर्तमानपत्रें, मासिकें यासारखें नियतकालीन वाङ्मय या काळचें वैशिष्टय गणलें जातें. या वाङ्मयापैकी कांही स्त्रीवाचकांकरितां मुद्दाम तयार केलेलें असतें. काहीं सरकारी खात्यांचें, तर कांही समाजांतील विशिष्ट वर्गांचे (उदा. वोक्कालिगर पत्रिके) मुख म्हणून प्रसिद्ध होतें म्हैसूर येथें प्रसिद्ध होणार्या ''वृत्तांत पत्रिके'' नांवाच्या साप्ताहिकाचा बराच खप आहे.
(ऊ) सर्व निरनिराळे संप्रदाय आपली तत्वें व देवता यांचा लोकांत प्रसार करण्याकरितां एकसारखें ग्रंथप्रकाशन करीत असतात. तिसरा कृष्णराज वोडेयर (१७९९-१८६८) याच्या आश्रयाखालीं बरेच ब्राह्मणी ग्रंथ तयार झाले. त्यांत ''कृष्णराजवाणीविलास'' नांवाची महाभारताची गद्यप्रत आहे. दुसरे ग्रंथ भक्तिसार वर्गांतले किंवा नीतिप्रबोधनाचे आहेत. कांही अर्वाचीन आस्तिक्यमताचे आहेत. या वर्गांत खालील ग्रंथांचा विशेष नामनिर्देश केला पाहिजे. रा. आर नरसिंहाचार्यांचा ''नीतिमंजरी'', यांत कांही तामिळी नीतिग्रंथांतील भाग प्राचीन कानडी पद्यरूपांत उद्धृत केलेले आहेत, 'मूदरै' आणि ''नलवले'' कर्ता औवैः ''नालडियार'' इत्यादि.
या वाङ्मयांत ख्रैस्त्याचाहि प्रवेश झाला आहे. बायबल त्यावरील टीका; हिंदु ख्रिस्ती समाजाकरतां ख्रैस्त्याचा इतिहास व वचनें यासंबंधी ग्रंथ, बनियनचे 'देशांतरीत प्रयाण' किंवा ''यात्रिक संचार''; ऑगस्टिनचें आत्मनिवेदन इत्यादि ख्रिस्ती साहित्य ग्रंथांचीं भाषांतरें; आणि ख्रिस्ती धर्मोपासनार्थ सांगत्यें म्हणजे गाणीं यांवरून हें दिसेलच.
प्रकाशनाला सुरवात ख्रिस्ती मिशनर्यांनीं करून दिली व त्यांनीच टाइपांमध्ये चांगली सुधारणा करून कानडीला ॠणी करून ठेविलें आहे. त्याचप्रमाणें भाषा व वाङ्मय यांचा काळजीपूर्वक अभ्यास करण्याचा धडा मिशनर्यांनींच घालून दिला आहे. उदाहरणार्थ पुढील ग्रंथ पहाः - बल्लारीच्या रे. डब्ल्यू.रीव्ह याचे ''इंग्लिश-कर्नाटका'' आणि ''कर्नाटका-इंग्लिश'' कोश; रे.एफ.किटेल याचा ''कन्नड इंग्लिश डिक्शनरी'' कोश व ऐतिहासिक ''कन्नड ग्रामर'' नांवाचा व्याकरणग्रंथ; याच पंडितानें केलेले '' छंदोंबुधि'' व शब्दमणिदर्पण हे ग्रंथ; याशिवाय रे. मोएग्लिंग, वगिल, वुर्थ इत्यादिकांचे उपयोगी ग्रंथ प्रसिद्ध आहेत.
कानडी वाङ्मयाची सद्यःस्थिति व उत्कर्ष - जर्मन मिशनरी आणि म्हैसूर सरकारच्या पुराणवस्तु खात्यांतील राइस आणि त्यांचे मदतनीस यांच्या संशोधनांनी कानडी वाङ्मयाचें भांडार उघडकीस आलें आहे. त्यांतील मुख्य मुख्य लेखकांचा काळ आणि त्यांच्याविषयीं बरीचशी माहिती उपलब्ध झाली आहे. म्हैसूर येथें स्थापलेल्या ओरिएन्टल लायब्ररीमध्यें हस्तलिखितांचा मोठा संग्रह आहे. ''बिब्लीओथेका कर्नाटिका'' मध्यें अनेक महत्वाचे ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत आणि ''काव्यमंजरी'' व ''काव्यकलानिधि'' या दोन ग्रंथमालांतून खासगी रीतीनें ग्रंथ प्रसिद्ध होत आहेत. १९१५ सालीं म्हैसूर सरकारच्या आश्रयानें ''कन्नडसाहित्य परिषद'' नांवाची एक संस्था स्थापण्यांत आलेली आहे. कानडी प्रदेशांतील सर्व भागांतील प्रतिनिधीतींत आहेत. हिचा उद्देश पूर्वीच्या वाङ्मयाचा अभ्यास करण्याचा आणि प्रस्तुतचे गुणी ग्रंथकार ह्यांना आश्रय देण्याचा आहे. शिवाय भाषेची जोपासना व वाढ हेहि या संस्थेचे हेतू आहेत. ही जोपासना व वाढ व्हावयाची ती पोटभाषांचे एकीकरण, शास्त्रीय परिभाषा ठरविणें, आणि सामान्य वाङ्मयीन भाषासरणी बनवणें, यांच्या योगाने होणार आहे. भाषा एकसारखी बदलत असल्यानें वरील क्रियांची फार आवश्यकता आहे. हल्लीचें बरेंचसें वाङ्मय व याच्या पुढीलहि, पद्यांतलें न होतां गद्यांतलेंच होईल. म्हणून शब्दकोश आणि सामान्य वाचकांनां कळण्याजोगी धाटणी उपयोगी होणार आहे. पूर्वीचे जुने शब्द व रूपें रूढींतून जातील. अर्वाचीन लेखकांनी नवीन युगाच्या कल्पना लोकांपुढें मांडतांना भाषेचे दोष वगळले पाहिजेत. हे दोष पुढील कारणामुळे होतात.
(१) म्हैसूरमध्ये मुसुलमानी राज्य असतां फारशी भाषा दरबाराच्या कामांत उपयोगांत आणली जाई; म्हणून जुन्या कानडीमध्ये फारशी शब्द व म्हणी विनाकारण बर्याचशा आढळून येतातच पण अजून देखील सरकारी कागदपत्रांत दिसून येतात. कशा तर्हेनें कानडी लिहावयाचें नाहीं याचें सरकारीं कागदपत्र हें उदाहरणच बनलें आहे. इंग्रजी शिकलेले कानडी लोक बोलण्यामध्यें इंग्रजी भाषा वापरतात व त्यामुळें परभाषामिश्रणाच्या बाबतींत वरील प्रमाणेंच स्थिति झाली आहे. घाईघाईनें लिहिलेल्या वर्तमानपत्रांतील लेखांतून हे दोष बरेचसे दृष्टीस पडतात आणि वाचकांना तीच संवय लागून त्यांची भाषा बिघडते.
(२) कानडीची ही एक मजा आहे कीं, इंग्रजीमध्यें येणारे विराम आणि उदगारचिन्हें यांची तिला गरज लागत नाही. तथापि अर्वाचीत कानडी ग्रंथांतून ही चिन्हांची पद्धत आल्याकारणानें भाषा ओबडधोबड दिसते व त्यामुळे लिहिण्याची धाटणी गबाळ होऊन तिच्यापासून बोध होण्याला बराचसा त्रास पडतो.
(३) ग्रंथातून दिसून येणारी आणखी एक वाईट पद्धत नालायक भाषांतरकारांमुळें पडली आहे. इंग्रजीप्रमाणें गुंतागुंतीची वाक्यें करून कानडींतील मूळची साधी धाटणी बिघडून टाकली आहे. कानडी वाक्य मोठें असलें तरी त्यांत एकमेकांवर अवलंबून असलेलीं पोटवाक्यें फारशीं आढळत नाहींत व त्यामुळें प्रधान-गौणांचा प्रश्न पुढें येत नाहीं व अर्थबोधाची हानी होत नाही. अशा तर्हेनें परकीय भाषांचा प्रवेश कानडी भाषेंत झाल्याकारणानें तिचें मूळचें स्वरूप बदलत चाललें आहे.
या आक्षेपाच्या यथार्थतेविषयी बराच मतभेद होण्याचा संभव आहे. कानडीवर कांहीतरी अर्वाचिन जगाचे व पूर्व परिस्थितीचे परिणाम होणारच. कानडी वाङ्मय समृद्ध करण्याकरितां पाश्चात्य भाषांचा असा उपयोग करावा कीं, त्यायोगानें नवीन उच्च कल्पना त्यांत येऊन जगभर पसरलेल्या दळणवळणापासून अस्तित्वांत येणार्या गोष्टीचें आविष्करण करण्यास चांगलें शब्दभांडार तयार होईल.
कानडी वाङ्मयांतील कांहीं विशिष्ट गोष्टी :-
(१) आपणांस असें दिसून येईल कीं, कानडी लेखकांचा कल सर्वस्वी पारमार्थिक आहे. जर व्याकरण आणि भाषाग्रंथ वगळले तर १९ व्या शतकापर्यत ज्याचा परमार्थाशी संबंध नाहीं असा ग्रंथ क्वचितच सांपडेल. त्याकाळचा इतिहासहि पारमार्थिक विचारांचा आणि चळवळींचा इतिहासच होईल. पौराणिक कथेंतच लेखकांनीं आपलें कौशल्य खर्चिलें आहे. आणि प्रत्येक ग्रंथ उघडतांच देवता आणि कर्त्याच्या संप्रदायांतील साधुसंत यांची भली लांबलचक स्तुति आढळून येते. याव्यतिरिक्त इतर इतिहास पाहण्याचा झाल्यास पुढील काळांत पहावा लागेल.
(२) १९ व्या शतकापर्यंतचें बरेचसें वाङ्मय पद्यांत आहे. जैन कवींनीं चंपु नांवाच्या पद्धातीचा उपयोग केला आहे. व मधून मधून पद्यमय खंडांतून गद्यांतील उतारेहि घातलेले आहेत. पण संबंध गद्यग्रंथ अलीकडे कांही वर्षांपावेतों अगदी थोडे होते. साध्या बोलण्याच्या सुरांत कानडी पुस्तक वाचल्यास त्यांतील स्वारस्य जातें, कारण ते गाण्याकरितां रचलेले असतें. काव्य बरोबर रीतीनें गाइल्यास कर्त्याचें पदलालित्य, अलंकार आणि छंद नजरेस पडून तें ऐकण्यालाहि गोड लागतें ज्यांनां अर्थ कळत नाहीं ते सुद्धं हें गाणें आनंदानें ऐकतील.
(३) काव्य आणि साहित्य या ग्रंथांना शब्दांचीं प्राचीन रूपें आणि हल्लीं रूढ नसलेले शब्द व त्याचप्रमाणें संस्कृत परिभाषा यांची जरूरी लागते. त्यामुळें सामान्य कानडी मनुष्याला मोठाल्या ग्रंथकारांचा अर्थ ध्यानांत येत नाहीं. अशीं पुस्तकें पंडितांकरितां लिहिलेली असतात. प्राथमिक शाळांतून जैमिनीभारतासारख्या ग्रंथांतील मोठमोठे भाग अर्थज्ञानाशिवाय मुलांकडून पाठ करून घेण्याचीं पद्धत सार्वत्रिक आहे.
(४) लेखांतील विनोद आणि कल्पकता यांची जी इतर भारतीयास फार आवड असते ती कन्नडांत देखील आहेच. द्व्यर्थी किंवा अनेकार्थी भाग ज्यांत आहे असे ग्रंथ तयार करणार्याचा फार लौकिक होतो. एकापुढील एक शब्द ओळीनेंच लिहिले जातात त्यामुळें अक्षरें अनेक रितींनीं विभागतां येतात व त्यामुळेंच श्लेषाला मदत होते. अशचा पद्धतीवर लिहिलेला असा एक संस्कृत ग्रंथ आहे कीं, तो एका पद्धतीनें विभागल्यास ती रामायणकथा होते व अन्य तर्हेनें विभागल्यास ती महाभारतकथा होते. श्लेष आणि विरूढ शब्द यांचा उपयोग केल्याच्या योगानें दोन गोष्टी घडतात; एक म्हणजे कवीच्या ग्रंथांचें विवेचन करण्यासाठीं सविस्तरपणें टीका लिहाव्या लागतात, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कानडी पद्याचें शब्दशः भाषांतर करणें जवळ जवळ अशक्य होतें; कारण मुळांतला अर्थ देण्यास श्लेषालंकाराचें संपूर्ण विवेचन करावें लागतें.
(५) कमल, भ्रमर, वीची, इत्यादि अनेक ठराविक उपमांचा कवि आपल्या काव्यांत मोठ्या चातुर्यानें उपयोग करीत असतो. त्याचा कोणला कंटाळा येत नाही. कांही उपमा वस्तुस्थितीशीं जुळत नसल्या तरी त्या काव्यांत शोभतात. उदाहणार्थ चकोर पक्षी केवळ चंद्रकिरणांवर आपली उपजीविका करितो, कमळें नद्यांतून वाढतात, अशोकांच्या झाडाला फळ येत नाहीं, चंद्रविकासी कमळें फक्त रात्रीं फुलतात इत्यादि. बाराव्या शतकांतील ''काव्यावलोकन'' ग्रंथांत याच्याविषयीं एक मजेदार प्रकरण आढळतें.
(६) पाश्चात्य वाङ्मयांत चांगलें आढळणारे शुद्ध मानवी प्रेम हिंदुस्तानांतील काव्यांत आढळत नाहीं याचें काही अशीं कारण स्त्रियांचा कनिष्ट दर्जा हें होय. बहुतांशीं बालविवाहामुळें हें घडत असावें. येथें स्त्रीपुरुषांनां तरुणपणीं अविवाहित स्थितींत अनुनयाला व परस्परांविषयीं नैसर्गिक लज्जा, आदर यांना अवसर सापडत नाही. हें एक खरें कीं बालविवाहामुळें तरुणांनां बिघडण्याची भीति कमी असते. पण वाङ्मयावर दुर्दैवानें त्याचा असा परिणाम होतो की, प्रियेबद्दल एखादी गणिका पहावी लागते, व शुद्ध प्रेमाची आरोग्यशील भावना जाऊन त्याच्या जागी काव्यग्रंथाला हानि करणारीं अनेक कामुक वर्णनें येतात. याला अपवाद म्हणून सीता व दमयंती यांचीं हृदयंगम उदाहरणें देतां येतील. कांही कानडी लेखक आपल्या भाषेंत चांगले प्रवीण आहेत, तरी जगाच्या ज्ञानांत व स्फूर्तीत त्यांनीं अतिशयच थोडी भर टाकिली आहे. आपल्या भाषेचा व्याकरणदृष्टीनें अभ्यास, बदलणार्या ॠतुमानांचीं वर्णनें यांत ते बरेच पुढें गेलेले आहेत. पण मनुष्याला अक्षय्य हितकारक अशा प्रश्नासंबंधी नवीन व कायमचे विचार यांच्यांत कमी दृष्टीस पडतात. हे निवृत्तिमार्गी असल्यामुळें मोठ्या कार्यांनां लागणारी आशा व स्फुर्ति ह्यांच्यामध्यें नाहीं. त्यांच्या कल्पना पौराणिक कथांच्या भोंवती फक्त फिरतात. स्फूर्ति देणारा चांगला उपदेशक किंवा तत्ववेत्ता याच्यांत नाहीं. हें विवेचन कानडीप्रमाणें अनेक आर्वाचीन भारतीय वाङ्मयांना लागू पडेल. मराठींत मात्र गणिकाप्रेमाचीं काव्ये नाहींत.
कानडी भाषाशास्त्रकार - प्राचीन काळापासून कानडी ग्रंथकारांनी व्याकरण, साहित्य आणि काव्यकला ह्यांच्यांत बरेचसें कौशल्य दाखविलें आहे. हे ग्रंथ अनेक शतकांतले आहेत. बरेचसे वैय्याकरणी जैन असून कानडी वाङ्मयाला त्यांनी चांगला हातभार लाविला आहे. इसवी सन ५०० मध्यें देवानंदी पूज्यपाद यानें ''जैनेंद्र'' नांवाचा एक संस्कृत व्याकरणग्रंथ लिहिला असल्याचें मागे सांगितलेंच आहे. तेराव्या शतकांतल्या बोपदेवानें संस्कृत व्याकरणावरील आठ आधारभूत ग्रंथांमध्यें ह्याचा समावेश केला आहे. ''अनेकशेष व्याकरण'' असें ह्याचें दुसरें नांव आहे.
इ.स.८५० च्या सुमारास ''कविराजमार्ग'' नांवाचा एक साहित्य ग्रंथ तयार झाला. काव्यादर्श या दंडीच्या ग्रंथावर याची उभारणी आहे.
इ.स.९८४ च्या सुमारास पहिला नागवर्मा यानें ''छंदोंबुंधी'' म्हणून कानडी छंदावर एक ग्रंथ लिहिला. त्यांतील प्रत्येक पद्य त्या छंदाचें उदाहरण म्हणून आहे. १८७५ सालीं डॉ. किटेल यानें तो छापून प्रसिद्ध केला.
बाराव्या शतकांत याच नांवाचा दुसरा एक वैय्याकरणी होऊन गेला. यानें दोन प्रख्यात व्याकरणग्रंथ (एक कानडी पद्यांत आणि दुसरा संस्कृत सूत्रांत) लिहिले. पहिल्याचें नांव ''शब्दस्मृति'' असें आहे. काव्यावलोकन नांवाच्या मोठ्या ग्रंथाचा तो पहिला भाग आहे. काव्यनिबंधावर हा ग्रंथ असून भाषा, व्याकरण, निबंधांतील दोष आणि सौष्ठव व काव्याचे नियम एकापुढें एक प्रकरणांत दिले आहेत. ''कर्नाटकभाषाभूषण'' हा याचा दुसरा ग्रंथ असून यांत २६९ सूत्रांत व्याकरणाचे नियम आणि वृत्ती संस्कृतमध्यें दिल्या आहेत. संस्कृत-कानडी कोशहि यानें केला असून अशा तर्हेचा हा पहिलाच ग्रंथ आहे. त्याचें नांव ''वस्तु कोश'' असें आहे. अमरकोशाचा त्यांत उल्लेख आहे.
पुढील शतकांत केशिराज यानें ''शब्दमणिदर्पण'' नांवाचा कानडी भाषा-ग्रंथ लिहिला. ''कंद'' छंदांत भाषा-नियम दिले असून गद्यांत त्याच्या वृत्तीहि दिल्या आहेत. डॉ. किटेलनें १८७२ सालीं तो टीकेसहित प्रसिद्ध केला. तामीळ आणि तेलगु भाषा-ग्रंथांच्यापेक्षां शब्दमणिदर्पणाचें महत्व फार आहे. त्यांत प्रख्यात ग्रंथकारांचे उल्लेख केले आहेत. ऐतिहासिक व शास्त्रीयदृष्ट्या हा ग्रंथ फार मौल्यवान आहे.
१६०४ सालीं ''कर्नाटक शब्दानुशासन'' नांवाचा ५९२ संस्कृत सूत्रांत भट्टाकलंकदेव यानें एक सटीक व्याकरणग्रंथ लिहिला. कानडी भाषेच्या अभ्यासकांनां उपयुक्त असे आणखीहि खालील ग्रंथ होत. ते कालानुक्रमानें पुढें दिले असून ज्यांच्या पुढें 'जै' असें आहे तो ग्रंथ जैन लेखकानें तयार केला आहे असें समजावें.
उदयादित्य (सुमारें ११५०) यानें काव्यकलेवर ७२ खंडांत ''उदयादित्यालंकारम'' नांवाचा लिहिलेला ग्रंथ. आंडय (जै.) (सुमारें १२३५) याचा ''कब्बिगर काव''. नाचिराज (सुमारें १३००), (जैं.) याचा 'अमरकोश व्याख्यान' नांवाचा अमरकोशावरील टीकात्मक ग्रंथ. ''कर्नाटक शब्दसार'' (सुमारें १३५०) नांवाचा १४१६ शब्दांचा एक गद्य कोश. अभिनव भंगराज (जै.) (सुमारें १३९८ याचा ) ''अभिनव निघंटु'' नांवाचा संस्कृत शब्दांचा कानडींत अर्थ दिलेला कोशग्रंथ. बोमरस (सुमारें १४५०) याचा ''चतुरास्य निघंटु'' यांत १३० खंडांत दिलेले समानार्थक शब्द आहेत. लिंग (सुमारें १४६०) याचा ''कब्बिगर कै-पिडी'' हा शैव कवींसाठी लिहिलेला ९९ पद्यांतील समानार्थक शब्दकोश आहे. तोटदार्य (सु.१४८०) याचा ''कर्नाटकशब्दमंजरी'' हा तद्भव आणि कानडी शब्द यांचा कोश. माधव (सु. पंधरावें शतक.) याचा दंडीच्या काव्यादर्शाचें भाषांतर केलेला 'माधवालंकार' नांवाचा ग्रंथ. ईश्वर कवि (सु. १५१०) याचा ''कविजिव्हाबंधन'' हा छंद, साहित्य आणि इतर विषय यांवरील ग्रंथ. ''कर्नाटक संजीवन'' (सोळावें शतक) नांवाचा शब्दकोश. देवोत्तम (सोळावें शतक) (जै.) याचा ''नानार्थरत्नाकर'' नांवाचा संस्कृत शब्दकोश. शाल्व (सोळावें शतक) (जै.) याचा ''रसरत्नाकर'' नांवाचा नाट्यावरील ग्रंथ. अभिनवविद्यानंद (सोळावें शतक), याचा ''काव्यसार'' नांवाचा काव्यावरील ग्रंथ. तिप्परस (सोळावें शतक), याचा ''नवरसालंकार'' नांवाचा रस आणि साहित्यालंकारावरील ग्रंथ. ''कविकंठाहार'' (सुमारें १६१०) नांवाचा समानार्थक शब्दांचा छंदोबद्ध ग्रंथ. तेसमलपंगार (सुमारें १७००), याचा ''अप्रतीम वीर चरित्र'' ग्रंथ इत्यादि.
आतां कांही कानडी व्याकरण-परिभाषांच्या व्याख्या खालीं दिल्या आहेतः- चंपु- मिश्र गद्यपद्य निबंध. रगळे = रागानुसार गावयाचा भावनात्मक प्रबंध. साहित्य - साहित्यात्मक पद्धातीवर लिहिलेला वाङ्मयनिबंध, वाङ्मय या अर्थानेंहि हा शब्द वापरतात. सांगत्य - वाद्यांवर गावयाचा निबंध. यक्षगान = रंगभूमीवर करून दाखवितां येण्याजोगा नाट्यनिबंध.
कानडीप्रदेशांतील संस्कृत ग्रंथकार - कानडी प्रदेशांत कानडी माणसांनी संस्कृत भाषेंत अनेक विख्यात ग्रंथ लिहिले आहेत. त्यांचाहि उल्लेख केला पाहिजे. समंतभद्र आणि पूज्यपाद, देवनंदी यांच्यासारख्या जैन कवींनीं संस्कृतांत लिहिंलेले ग्रंथ पाठीमागें आलेलेच आहेत. पोन्न, दुसरा नागवर्म, पलकुरीकेसोम, आणि षडक्षरदेव हे संस्कृत आणि कानडी ह्या दोन्ही भाषेंत चांगले पंडित असून कांहींना ''उभयकवी'' अशी मानाची पदवी आहे. भट्टाकलंकाच्या संस्कृतमधील कानडी व्याकरणचा उल्लेख मागें केलेलाच आहे. आणखी कांहीं लेखक पुढें दिले आहेत :-
नवव्या शतकांत शंकराचार्यांनी श्रृंगेरी येथें आपला मुख्य मठ स्थापिला. त्यांच्या कांही टीका येथेंच लिहिल्या गेल्या असाव्यांत.
१०८५ मध्यें बिल्हण नांवाच्या काश्मिरी ब्राह्मणानें ''विक्रमार्क देवचरित्र'' नांवाचे काव्य लिहिलें. त्यांत विक्रम नांवाच्या चालुक्य राजाचें वर्णन आहे. चालुक्याच्याच दरबारी विज्ञानेश्वर यानें ''मिताक्षरा'' नांवाची याज्ञवल्क्य स्मृतीवर मोठी आधारभूत टीका लिहिली.
तेराव्या शतकांत मध्वाचार्यानें द्वैतपंथ स्थापिला. कानडी प्रदेशात उड्डपी येथें त्याचा मुख्य मठ असून तेथे त्याने आपले टीकात्मक ग्रंथ लिहिले. कानडी वाङ्मयावर त्याचा बराच प्रभाव पडला आहे.
चवदाव्या शतकांत मध्वाचार्य ह्यांने ''सर्वदर्शनसंग्रह'' हा विख्यात ग्रंथ लिहिला. याचा भाऊ सायणाचार्य यानें वेदांवर भाष्यें लिहिलीं. याच सुमारास उडुपी येथें जयतीर्थाचार्य नांवाचा माध्वपंथाचा एक मुख्य प्रतिनिधि होऊन गेला. शृंगेरी, मेलकोटें आणि उडुपी येथील मठांच्या गुरूंनी अनेक जाडे जाडे संस्कृत ग्रंथ तयार केले असले पाहिजेत.
कानडी व मराठी - या दोन भाषांत बरेंच साम्य आढळतें. शब्दकोश, व्याकरण, वाक्प्रचार वगैरेंची तुलना केल्यास (रा. विठ्ठल रामजी शिंदे यांनी केसरींत १९२३ च्या नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांत ४ लेख लिहून हें साम्य दिग्दर्शित केलेंच आहे) कानडी भाषा संस्कृताप्रमाणेंच आधुनिक मराठीची एक जननी म्हणतां येईल. ज्ञानेश्वरालाहि आपल्या ग्रंथरचनेंत कानडी शब्द रूढ म्हणून घालावे लागले. अमृतानुभवांत आलेले कानडी शब्द म्हणून दाखविले आहेत. उदाः- आडवी (अरण्य), नींद (नीज), बोण (नैवेद्य), मा,मत्तु (आणखी), उगळी (ओक), मुग (मुका) इत्यादि. शब्दाचे अंत्य स्वर'उ' होणें ही प्राचीन मराठींतील पद्धत कानडींतून घेतलेली असणें अशक्य नाहीं. अप्पा, चक्का, अण्णा, आत्ते हे नात्याचे शब्द कानडींतून मराठींत आले आहेत. रा. अण्णा किर्लोस्करांनी सुरू केलेलें मराठी नाट्यसंगीत हे यक्षगानासारखीं कानडी नाटकें बर्याच शतकांची जुनीं झाल्यावर त्यांच्या अनुकरणाने इकडे रूढ झालें. यावरून मराठी भाषेच्या सौंदर्यांत व वैभवांत कानडी भाषेनें बरीच भर टाकली आहे हें विसरून चालणार नाही. मराठींतील मुलांची गाणीं (अडगुलें मडगुलें, औडक चौडक दामाडू वगैरे) व खेळ (वखट लेंडमुंड) ही कानडी संस्कार दाखवितात.
(संदर्भग्रंथ :- 'दि हेरिटेज ऑफ इंडिया सीरजि' मधील राईस साहेबाचें कानडी वाङ्मयावरील पुस्तक आम्ही आधाराला घेतलें आहे. या लहानशा सुंदर पुस्तकांत कानडी वाङ्मयाचें चिकित्सक पद्धतीने परीक्षण केलें आहे. याच कर्त्याचीं 'मायसोर' (म्हैसूर), 'मायसोर अॅड कुर्ग फ्राम दि इन्स्किप्शन्स' व 'दि लिटरेचर ऑफ कर्णाटक' (कर्णाटक शब्दानुशासन या भट्टाकलंकदेवाच्या ग्रंथाला प्रस्तावना) हीं पुस्तकेंहि उपयुक्त वाटतील. शिवाय इतर संदर्भग्रंथ म्हणजे, रेव्ह. किटेल-ओल्ड कॅनरीज लिटरेचर (इं.अॅं.पु.४, १८७५ मधील निबंध), काल्डवेल-कंपॅरिटिव्ह ग्रामर ऑफ दि द्रविडियन लँग्वेजेस; एपिग्राफिआ कर्नाटिका, आर. रघुनाथराव-एसेज ऑन कॅनरीज ग्रामर, कंपॅरिटिव्ह अॅंड हिस्टॉरिकल; किटेल-कन्नड इंग्लिश डिक्शनरी; नरसिंहाचार्य-कर्नाटक कविचरितें; कर्नाटक काव्यमंजरी, रा.वि.रा. शिंदे यांनीं १९२३ च्या अखेरीस केसरींत कानडी-मराठी भाषांवर तुलनात्मक लेख लिहिले आहेत, ते विचारणीय आहेत. कर्नाटकीय भाषाशास्त्राकडे आणि वाङ्मयेतिहासाकडे महाराष्ट्रीय लेखकवर्गाचें अजून चांगलें लक्ष लागलें नाहीं.)
Comments
Post a Comment